Wednesday, April 21, 2010

जोडी तुझी माझी

जोडी तुझी माझी

प्रियकर-प्रेयसी असो किंवा पती-पत्नी, कोणत्याही कपलमधलं नातं त्यांच्यातल्या खास बॉण्डिंगमधून खुलत जातं. हेल्दी रिलेशनशिप दोघांनाही उत्साही-आनंदी बनव

ते. तुम्ही जितके आनंदी असाल तितका त्याचा तुमच्या आरोग्यावर पॉझिटिव्ह परिणाम होत असतो.
.........

सोनाली आणि अमोल एक तिशीतलं छान कपल. अमोल सॉफ्टवेअर इंजिनीअर तर सोनाली एचआर पर्सन. दोघंही आपापल्या करिअरमध्ये बिझी. ऑफिसचे व्याप सांभाळून दोघंही थकून-भागून रात्रीच घरी यायचे. सकाळी उठून पुन्हा ऑफिस गाठायची घाईगडबड असायची. पण दोघांचंही नातं इतकं सुंदर होतं की जणू मेड फॉर इच अदर. सकाळी चहाचा पहिला कप अमोलकडून सोनालीच्या हातात मिळायचा. त्याचबरोबर भाजीपासून ते कांदा चिरुन देण्यापासून अनेक कामं तो करून ठेवायचा. तर त्याला आवडणारी भाजी, हटकून लागणारी स्वीट डिश ती आठवणीने त्याच्या टिफिनमध्ये ठेवायची. त्याचं बँकेतलं एखादं रुटिन काम ती न सांगता करून टाकायची. दिवसभरात कामाच्या व्यापातूनही वेळ काढून दोघं एकमेकांशी फोनवर बोलायचे. एखादा गोड एसएमएस दोघांच्याही गालावरची खळी खुलवून जायचा.

नातं, मग ते कोणतंही असो एकमेकांशी असलेल्या बॉण्डिंगमधून ते खुलत जातं. विशेषत: पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी असेल तर दोघांच्या नात्यात आपसूकच एक गोडवा असतो. या नात्यातला गोडवा अधिकाधिक खुलवणं दोघांच्या हातात असतं. एकमेकांवरचा गाढ विश्वास, एकमेकांची काळजी, एकत्र असण्यातला आनंद, दोघांनी एकमेकांना दिलेला 'क्वॉलिटी टाइम' या साऱ्यातून नातं खुलतं आणि दोघंही आनंदी राहतात. जेव्हा मन आनंदी असतं तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. सुदृढ नाती आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही उपयुक्त ठरतात. याबाबत सांगताना डॉ. सतीश नाईक म्हणतात की, विशिष्ट वयानंतर प्रत्येकाच्या शरीरात स्ट्रेस हामोर्न्स तयार होत असतात. मानसिक ताणतणाव अधिक असतील तर त्यांची निमिर्ती अधिक होते. पण रोजच्या आयुष्यातला तणाव कमी असला तर स्ट्रेस हामोर्न्स फारसे तयार होत नाहीत. त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबीटिस यासारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. नियमित झोप होत असल्याने शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. अशा कपलमधलं सेक्सचं रिलेशन चांगलं असतं. महत्त्वाचं म्हणजे यातून समाधानी राहण्याचा आनंद मिळतो. एकमेकांवर खूप प्रेम करणारी, एकमेकांना सांभाळून घेणारी कपल म्हणजे हामोर्नियस कपल. एकमेकांचा सपोर्ट चांगला मिळत असल्याने मानसिक तणाव राहत नाहीत. ताणतणाव जितके कमी आणि तुमच्यातलं आनंदाचं समाधानाचं वातावरण जितकं अधिक तितके तुम्ही हेल्थवाइज फिट राहता इतकं साधं-सोपं हे गणित असल्याचं ते समजावून सांगतात.

मॅरिड कपलमध्ये हेल्दी नातं असण्याचा चांगला परिणाम मुलांवरही होतो. आपल्या आई-वडिलांमधलं खेळीमेळीचं, सुदृढ नातं, त्यांच्या नात्यातला गोडवा मुलं सतत जवळून पाहत असतात. त्यातून त्यांच्यावरही सकारात्मक परिणाम होतो. मुलं मानसिकदृष्ट्या स्टेबल राहिल्याने त्यांचा विकास चांगल्या तऱ्हेने होतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेकदा आजार, दुखणं -खुपणं येत असतं. एखाद्या गंभीर आजारात जीवनसाथीकडून मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा ठरतो. आजारपणात साथीदाराकडून प्रेमाने घेतली जाणारी काळजी मनाला उभारी देते आणि त्यातून लवकर रिकव्हरी होते. दोघांमधल्या हेल्दी रिलेशन्समुळे घडून येणारे हे पॉझिटिव्ह परिणाम.
............

तुमच्या दोघांमधलं नातं हेल्दी ठेवण्यासाठी या काही टिप्स :

* कम्युनिकेशन : दोघांमध्ये सुसंवाद होतो की नाही, हे लक्षात घ्या. एकमेकांशी बोलून, चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.

* शेअरिंग : एकमेकांबद्दलच्या भावना, एकमेकांचं सुखदु:ख शेअर करायला हवं. यातूनच विश्वासाचं नातं निर्माण होतं.

* प्रामाणिकपणा : दोघांचं नातं खरंच जपायचं असेल, तर खोटेपणाला थारा देऊ नका.

* आदर आणि विश्वास : एकमेकांपासून जवळ असा किंवा लांब; एकमेकांबद्दल आदरभाव आणि विश्वास ठेवायला शिका.

* वाद हाताळायला हवे : दोन भिन्न व्यक्तींमध्ये वादविवाद होतातच. आपल्यामधले वाद मतभेदांपर्यंतच शिल्लक ठेवा. त्यांना टोकांचं रूप देऊ नका.

* समजून घ्या : काही वेळा बाहेरच्या कोणत्या तरी कारणावरून तुमचा पार्टनर अपसेट असू शकतो. या गोष्टी त्याला तुम्हाला लगेच सांगायच्या नसतील. तेव्हा त्याच्या मागे लागून ती गोष्ट जाणून घेण्याचा अट्टाहास करू नका. थोडा वेळ जाऊ द्या.

* स्पेस द्या : प्रत्येकाचं स्वतंत्र, वैयक्तिक असं जग असतं. सगळ्याच गोष्टी त्याला/तिला तुम्हाला सांगायच्या नसतील किंवा त्याला/तिला आपल्या फ्रेण्ड्सबरोबर राहण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठीही वेळ हवा असतो. ते जगही त्यांना एन्जॉय करू द्या.

* एकमेकांना वेळ द्या : आजच्या धावपळीच्या जगात एकमेकांसाठी भरपूर वेळ नसतो. त्यामुळे दोघांनी आपल्या शेड्युलनुसार ठरवून एकमेकांना वेळ द्या. या वेळेत एखादं सरप्राइज डिनर किंवा गिफ्ट देऊन त्याला/तिला खुश करता येईल.

* पॉवर ऑफ टच : प्रत्येक वेळेस शरीरसंबंधांची गरज असतेच असं नाही. एक प्रेमाचा स्पर्श, एखादा रोमॅण्टिक किस तुमच्या सर्व भावना त्याच्या/तिच्यापर्यंत पोहचवू शकतो.

* सणसमारंभ साजरे करा : तुम्हाला वेळ नसला, तरी त्याच्यासाठी, त्याच्या घरच्यांसाठी आणि पर्यायाने तुम्हाला होणाऱ्या आनंदासाठी सणसमारंभ साजरे करा किंवा इतरांकडे होणाऱ्या समारंभांना हजर रहा. आजच्या धावपळीच्या जगात ते शक्य नाही, हे मान्य. पण, तरीही जमेल तेव्हा हे करून पहा. सासरची मंडळी सुनेवर खुश होतीलच.

* लविंग नोट : कामाच्या धबडग्यात कोणी एकापासून लांब असू शकतं किंवा एकाच घरात राहूनही दोघांची दोनचार भेट होत नाही. अशा वेळी एकमेकांना मेसेज, इमेल किंवा घरी चिठ्ठी लिहून आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे, या भावना व्यक्त करायला हरकत नाही.

* टीका नको : सतत एकमेकांवर किंवा त्यांच्या घरच्यांवर टीकेचा आसूड उगारायला नको.

Thanks Maharashtra Times Team

Sunday, March 21, 2010

वाईट कामांना नेहमी चांगल्या कामांनी झाकलं पाहिजे

राज्याची प्रजा राजाच्या कारभारावर नाराज होती. तिच्या मनात खूप तक्रारी होत्या. त्यामुळे एक दिवस राजाच्या विरुद्ध मोर्चा काढण्यासाठी प्रजा रस्त्यावर उतरली. ही गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली.
त्याने फर्मान सोडले की, जशी गरज असेल तसे पाऊल उचला, पण कसेही करून हा मोर्चा, हा उद्धटपणा थांबवा.
मोर्चा निघाला पण लवकरच तो गोळीबार, लाठीमार करून अडवला गेला. ज्याने बरेच लोक घायाळ झाले. इकडे तिकडे पांगले गेले. मोर्चाच्या नेत्यांना अटक केली गेली. शहरात दहशत पसरली.
काही काळानंतर प्रधानाच्या हुकूमानुसार शहरात बरीच चांगली कामे होऊ लागली, धान्य स्वस्त झालं, नवीन कारखाने उघडले गेले, रस्ते बनवले गेले. हे सगळं बघून एका सभ्य माणसाने प्रधानाला विचारलं, ‘‘तुम्ही तर कमाल करत आहात, काल तुम्ही ह्य़ा शहरातील लोकांवर गोळ्या झाडून त्यांना मारून टाकत होता आणि आज त्याच शहरातील लोकांच्या सुखासाठी, प्रगतीसाठी प्रयत्न करत आहात?
हुशार प्रधानाने उत्तर दिलं, मी मांजरीकडून एक धडा शिकलोय, तिने जर एखाद्या चांगल्या जागेवर घाण केली तर त्यावर ती लगेचच माती पसरून देते.
वाईट कामांना नेहमी चांगल्या कामांनी झाकलं पाहिजे. कारण निवडणुका येईपर्यंत लोक आम्ही केलेले वाईट काम विसरून जातील आणि आमची चांगली कामंच लक्षात ठेवतील.

Sunday, March 7, 2010

अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!

अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधी बाकावरील काही मंडळी निषेध म्हणून उठून गेली. त्यामुळं बादशहा  अस्वस्थ झाला. अर्थमंत्री एवढा विचार करून, मेहनत करून अर्थसंकल्प तयार करतात, त्यावर विचार करून त्यातील त्रुटी दाखवून द्याव्यात, काही सूचना कराव्यात हे सर्व सोडून विरोधी गटानं अर्थसंकल्प न ऐकताच पळ काढावा हे बादशहाला रुचलं नाही आणि पटलंही नाही. या सर्व प्रकारामुळं अर्थमंत्रीही नाराज झालेले दिसत होते. बादशहानं त्यांना आपल्या नजरेनंच दिलासा दिला आणि अर्थसंकल्पाचं वाचन पुढे सुरू ठेवण्यास सांगितलं.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी तो उत्तम आहे असं सांगितलं तर विरोधकांनी त्यातील दरवाढीचा निषेध केला. काही गट जे बादशहासोबत सत्तेत भागीदार होते त्यांच्या प्रदेशात निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यांनीही भाववाढीला विरोध केला.
त्याच रात्री बादशहानं बिरबलाला विचारमंथनासाठी बोलावलं. बादशहाची नाराजी बिरबलाच्या नजरेनं टिपली होती; त्यामुळं त्याला अंदाज आला होता. बिरबल आल्यावर थोडावेळ राज्याच्या दैनंदिन कामांची चर्चा झाली आणि मग बादशहानं आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. ती ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘हा त्या विरोधकांचा दोष नव्हे, आपल्या संसदीय संकल्पनांचा दोष होय.’ बादशहाला त्याचा अर्थ कळला नाही तेव्हा बिरबल अधिक स्पष्ट करत म्हणाला, ‘खाविंद आपण लोकप्रतिनिधींची विभागणी ‘सत्ताधारी आणि विरोधक’ अशी करतो. एकदा विरोधक म्हटलं की त्यानं प्रत्येक गोष्टीला विरोध करणं ओघानं आलंच. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच विरोधकांची त्यावरील प्रतिक्रिया ठरलेली असते, मग तो त्यांनी ऐकला काय आणि न ऐकला काय याने काय फरक पडतो?’ बादशहा ऐकून विचारात पडला त्याची ही मन:स्थिती हेरून बिरबल पुढे म्हणाला, ‘सत्ताधारी आणि सत्तेवर नसलेले’ अशी खरं तर विभागणी व्हायला पाहिजे. ‘यावर उपाय काय?’ बादशहानं कळीचा प्रश्न विचारला. बिरबल म्हणाला, ‘आहे ना. पुढच्या वर्षी अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!
बिरबलाची सूचना मान्य करत बादशहानं त्याला रात्रीच्या भोजनासाठी आग्रहानं थांबवून ठेवलं. ‘मी रात्री जेवायला घरी नसेन’ हे बिरबलानं घरी आधीच सांगून ठेवलं होतं.

Sunday, February 21, 2010

ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो

मंत्रिमंडळाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेणारी बैठक सुरू होती. प्रत्येक मंत्री आपापला अहवाल सादर करत होता. मंत्र्यांच्या समोर द्राक्ष्याचे तजेलदार घोस चांदीच्या तबकांमध्ये ठेवलेले होते. एकूण मंत्र्यांच्या कामगिरीवर बादशहा समाधानी होता. बिरबल शांतपणे प्रत्येक मंत्र्याचा अहवाल ऐकून टिपणं काढत होता. बैठक सुरू असतानाच अचानक बाहेर गोंगाट, घोषणाबाजी, दगडफेक अशी गडबड सुरू झाली. सुरक्षा यंत्रणा लगबगीनं कामाला लागली. बादशहाने सेवकाला बाहेर काय गडबड चालली आहे ते पाहून येण्यास सांगितले. सेवक गेला आणि परत येऊन म्हणाला, ‘खाविंद, बाहेर मोठ्ठा मोर्चा आहे, ऑस्ट्रेलियन, पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या देशात खेळायला येऊ नये, त्यांना अटकाव करावा.. अशी मागणी करीत आहेत ते!’ तोवर गृहमंत्र्यांनी जाऊन बंदोबस्ताची पाहणी करून काही आदेशही दिले होते. त्यामुळे बैठक शांततेत पार पडली.
बैठक संपल्यावर बादशहा आणि बिरबल शाही भोजनासाठी एकत्र गेले. मटारच्या करंज्या, हरभरा भात असा संपूर्ण शाकाहारी बेत होता. तोंडात तुकडा ठेवताच स्वादिष्ट सुखाची भावना भरून यावी अशा त्या करंज्यांचा आस्वाद घेता घेता बादशहा म्हणाला, ‘मला एक कळत नाही, अमूक देशांच्या खेळाडूंना इथं पाय ठेवायला देऊ नका, तमूक देशाशी खेळू नका अशी अतिरेकी भूमिका ही माणसं का घेतात? अरे हा काय पोरखेळ आहे का? राजकारण वेगळं असतं आणि खेळ, कला या गोष्टी वेगळ्या असतात!’
हरभरा भाताचा घास घेत, ताकाची वाटी हाती धरत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ही माणसं अशी अतिरेकी भूमिका घेतात हे तुमचं केवढं नशीब म्हणायचं?’ हे ऐकून बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘आता ह्यात तुला माझं नशीब कुठं दिसलं?’
जिरे-हिंगाची मस्त फोडणी घातलेल्या ताकाचा घोट घेत बिरबल म्हणाला, ‘खाविंद,  ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो. अशी माणसं सत्तेत येऊ नयेत याची काळजी लोकच घेत असतात. आणि खरं सांगायचं तर अशा मानसिकतेच्या व्यक्तींना सत्तेची जबाबदारी नकोच असते. त्यांना दहशतीचं एक समांतर साम्राज्य फक्त उभं करायचं असतं.. आणि अशी दहशत टिकविण्यासाठी ते देशभक्तीच्या भडक व्याख्या करीत अतिरेकी भूमिका घेत राहतात..!’
बादशहा खाता खाता थांबून विस्मयानं सगळं ऐकत होता. बिरबलाचं तर्कशुद्ध विश्लेषण ऐकून त्याचा चेहरा खुलून आला व तो बिरबलाला म्हणाला, ‘म्हणजे फार काळजी करण्याची गरज नाही!’ करंजीचा शेवटचा घास घेत बिरबल म्हणाला, ‘काळजी करण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजेच!’ ‘सुभानअल्लाह क्या बात कही बिरबल’ असं म्हणत बादशहानं आपल्या हातानं आणखी दोन करंज्या बिरबलाच्या ताटात घातल्या!

Sunday, February 7, 2010

भावनांचं राजकारण हे अंमली पदार्थाच्या सेवनासारखं असतं

‘जो या राज्यात जन्मला तोच या राज्याचा, बाकी सर्व उपरे!’ एका तरुण नेत्यानं जोरदार गर्जना केली. लाखो हातांनी टाळ्यांचा कडकडाट केला. समूहाच्या मनात जणू ‘आपण कुणीतरी खास आहोत’ अशी रोमांचक भावना निर्माण झाली. या भावनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले. बादशहाकडे या बातम्या पोहोचत होत्या व हळूहळू त्याची अस्वस्थता वाढत होती. ‘सलग १५ वर्षे ज्याचे वास्तव्य या राज्यात आहे तो अधिकृत’ असं एकेकाळी म्हटलं जात होतं. परंतु अलिकडे ‘आपला आणि उपरा’ यांच्या व्याख्या बदलल्या, स्वरूपही बदलले होते. त्यामुळं सलोख्याला सुरूंग लागला होता. काहीतरी करायला हवं, असं बादशहाला वाटू लागलं आणि त्यानं बिरबलाला बोलावणं पाठवले. ‘सगळं काही आलबेल आहे, बादशहानं कशाला बरं बोलावलं असेल’ असा विचार करीत बिरबल बादशहाकडे पोचला. ‘खाविंद, आपण याद केलीत माझी?’
बादशहा म्हणाला, ‘मला फार काळजी वाटते आहे, राजधानीतलं वातावरण गढुळलं आहे, मनामनात अदृश्य भिंती उभ्या राहत आहेत.’
बिरबल म्हणाला, ‘खाविंदांनी निश्चिंत असावं, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे!’
बादशहाला बिरबलाचं उत्तर ऐकून आश्चर्य वाटलं. ‘अरे, जो या राज्यात जन्मला तोच इथला, अशी अतिरेकी घोषणा देण्यापर्यंत मजल गेली आहे, आणि तू म्हणतोस मी निश्चिंत असावं!’
बिरबल हसला आणि म्हणाला, ‘खाविंद, भावनांचं राजकारण हे अंमली पदार्थाच्या सेवनासारखं असतं. त्याचा डोस सतत वाढवत राहावा लागतो. आणि एक वेळ अशी येते की, डोस कितीही वाढवला तरी त्याची किक बसत नाही. म्हणूनच म्हटलं, डोस वाढवला जातोय म्हणजे अगदी योग्य दिशेनं चाललं आहे राजकारण!
बिरबलाचा हा तर्क ऐकून बादशहा गोंधळला. जरा अविश्वासानंच म्हणाला, ‘पण खरंच असं होईल?किक बसणार नाही,अशी वेळ येईल? बिरबल शांत स्वरात म्हणाला, ‘खाविंद या नेत्याच्या पूर्वसूरींना अखेर अंमली पदार्थाचा ब्रँड बदलून राजकारण करण्याची वेळ आली होती हे विसरू नका!’ आणि मग बादशहा निर्धास्त झाला व म्हणाला, ‘चहा नामक मादक पेय चालेल का तुला आत्ता?’ अर्थात बिरबलाने ते आमंत्रण आनंदाने स्वीकारलं!

Monday, February 1, 2010

काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते

दिवाळीच्या सुमारास बादशाह आणि बिरबल रात्रीच्या वेळी राजधानीचा एक फेरफटका मारण्यास निघाले. सगळीकडे प्रकाशाचं साम्राज्य पसरलेलं होतं. रंगीबेरंगी दिव्यांनी आकाश व्यापलं होतं. दारादारात तेला-तूपाचे दिवे लागलेले होते. महागडय़ा वस्त्रांची दुकानं गर्दीनं तुडुंब भरलेली होती. जिथं-तिथं ‘डिस्काऊंट सेल’ लागलेले होते आणि तिथं अधिकच गर्दी होती. सुगंधी फवारे, सुगंधी तेले, उटणे यामुळं आसमंत सुगंधाच्या विविधतेत न्हाला होता. फराळाच्या पदार्थाची दुकानं पिशव्या भरभरून पदार्थ विकत होती. शिवाय घराघरात तळणी-भाजणी सुरू होतीच. मूलं-माणसं फटाक्यांचा, शोभेच्या दारूचा आनंद लुटत होती. हे सर्व पाहता पाहता बादशाह अचानक थबकला आणि बिरबलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘एकूण मला तुम्ही जे काही रिपोर्ट्स देता ते सगळे खोटे आणि फसवे असतात तर!’’ बिरबल म्हणाला, ‘‘ तुम्हाला काय म्हणायचे आहे खाविंद?’’ बादशहा घुश्शातच म्हणाला, ‘‘महागाई, मंदी, नोकरकपात, दुष्काळ, नापिकी, भ्रष्टाचार यामुळं जनता त्रस्त आहे असं तू मला नेहमी सांगत असतोस.. आणि प्रत्यक्षात तर जनता आनंदी दिसते आहे. केवढा उत्साह आहे दिवाळीचा? कुठं आहे तुझी ती महागाई? कुठं आहे मंदी?’’ बिरबल काहीच बोलला नाही, कारण बादशहाचा पारा खूपच चढलेला होता. बादशहाला जरा वेळानं बिरबलानं निरोपाचा कुर्निसात केला तेव्हाही तो रागातच होता. आठवडाभरानं बिरबल पुन्हा बादशहाच्यासमोर बसलेला होता. बादशहाच्या सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता त्याविषयी विचार करण्यासाठी ही बैठक होती. बैठक सुरू झाली आणि मोठय़ा बेगमची दासी धावत आली. म्हणाली, ‘‘बेगमच्या अब्बाजानची तब्येत खूपच खालावली आहे.’’ ते ऐकून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, अशा स्थितीत आपण सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन करू नये!’’ त्यावर बादशहा म्हणाला, ‘‘बिरबल, काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते.’’ हे ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘‘लोक दिवाळी साजरी करताना, असाच विचार करतात खाविंद!’’ बादशहा चमकचा आणि दासीकडे पाहून म्हणाला, ‘‘अगं मोठय़ा बेगमच्या अब्बाजानच्या इंतकाल (निधन) तर गेल्यावर्षीच झाला ना?’’ आणि मग बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘आम्हाला धडा शिकवलात ना, चला आता वर्धापनदिनाची तयारी करू या!

एनी पब्लिसिटी इज ए गूड पब्लिसिटी

गेले काही दिवस राज्यात मोठाच गदारोळ सुरू झाला होता. वृत्तपत्रे, वाहिन्यांवर एक चर्चा सुरू होती. अमूक चित्रपटातील दृश्यांवर एका नेत्याने कात्री चालवणे भाग पाडले. मग त्या चित्रपटाचे खास खेळ रोज वेगवेगळ्या नेत्यांसाठी होऊ लागले. कधी त्या नेत्याचा एखाद्या संवादावर आक्षेप असे तर कधी त्या नेत्याचे भक्त दुखावत. मग त्यांच्या मर्जीप्रमाणे चित्रपटात बदल करत असल्याची घोषणा केली जात असे. नेते आणि त्यांचे भक्त सदैव तोडफोडीची भाषा करत प्रसंगी तोडफोड करीतही होते.
मग एका चित्रपटाच्या शिर्षकावर कोणाची तरी खप्पामर्जी झाली. पुन्हा धमकावण्याची भाषा, ‘अमूक करू, तमूक करू’ची भाषा. निर्मात्याची धावाधाव आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची हाती पेन धरून किंवा माईक धरून धावपळ.हे सगळं पाहून बादशहा जाम वैतागला. ‘चित्रपटात काय दाखवणं योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी एक समिती आहे ना नेमलेली, मग हे सगळं कशासाठी?’ असं बादशहा करवादून म्हणाला. बिरबलानं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक यांची अवस्था, नेत्यांची उद्दाम भाषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नव्यानं होत असलेली चर्चा यामुळं बादशहा सतत त्याच गोष्टींचा विचार करत होता.
अखेर बादशहानं बिरबलाला विचारलं, ‘यावर आपण काही तरी करावं, या हस्तक्षेपाला पायबंद घालावा, असं तुला नाही का वाटतं?’
बिरबल म्हणाला, ‘खाविंद, आज घडीला जेवढय़ा चित्रपटांची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे त्यातील दहा चित्रपटांची नावं काढूया.’ तशी काढण्यात आली. मग बिरबल म्हणाला, ‘आता आपले गुप्तहेर या दहा निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या घरी पाठवा आणि अहवाल मागवा.’ बादशहाने बिरबलाची ती सूचनाही अंमलात आणण्याचे फर्मान सोडले. अहवाल आल्यावर बिरबलाने गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाला विचारले, ‘आपला निष्कर्ष सांगा.’ बादशहाला कुर्निसात करून गुप्तहेर प्रमुख म्हणाला, ‘जहांपनाह, हे सर्वच्या सर्व दहा निर्माते रोज देवाला प्रार्थना करीत आहेत, देवा, आमच्या चित्रपटाबद्दलही काही तरी वाद होऊ देत!’
बादशहाला आश्चर्य वाटलं. बिरबल म्हणाला, ‘एनी पब्लिसिटी इज ए गूड पब्लिसिटी, हे आजचं घोषवाक्य आहे खाविंद. अशी प्रसिद्धी झाली की लोक चित्रपटाला हमखास गर्दी करतात. त्यामुळं हे प्रकार अनेकदा संगनमतानं होतात. कधी कधी ते खरेही असतात.’
बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘अल्लाह, हे असे आहे तर! मग लोकशिक्षणाची खरी गरज आहे.’
बिरबल हसत हसत म्हणाला, ‘खाविंद, लोकशिक्षण हे आयुर्वेदासारखं आहे, एक तर त्याचा प्रभाव जाणवायला काळ जावा लागतो आणि दुसरं म्हणजे, त्याची मात्रा  प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी द्यावी लागते!’
आयुर्वेदाची उपमा बादशहाला बेफाम आवडली. तो हसत हसत बिरबलाला म्हणाला, ‘चल, काढा घेऊ या!