Tuesday, January 19, 2010

इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?

बादशहानं आपल्या मुलाचं इतिहासाचं पाठय़पुस्तक सहज म्हणून चाळलं आणि ते वाचता वाचता तो भयंकर संतापला. पाठय़पुस्तकात बादशहाच्या कर्तृत्ववान खापर पणजोबांवर एक धडा होता. त्या धडय़ात बादशहाच्या खापर पणजोबांविषयी दिलेली काही माहिती बादशहाला रुचली नाही. बादशहानं संतापून ते पुस्तक भिरकावून दिलं आणि बिरबलाला बोलावणं धाडलं. बादशहाला एवढं संतापलेलं बिरबलानं कधीच पाहिलेलं नव्हतं. ‘खाविंद, एवढं संतापायला काय झालंय आज?’ असं त्यानं विचारताच बादशहानं इतिहासाच्या पुस्तकातील धडय़ाविषयी त्याला सांगितलं. बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांची आणि सत्ताधिशांची मर्जी सांभाळणारे, लाळघोटे इतिहासकार आपल्या राज्यात नाहीत, याचा तुम्हाला खरं तर अभिमान वाटायला हवा!’ बादशहा म्हणाला, ‘परंतु हे सगळं खोटं आहे! बिरबल म्हणाला, ‘ठीक आहे, मग काय करावं, अशी तुमची इच्छा आहे?’ बादशहा म्हणाला, ‘हे सर्व बदलून टाका, माझ्या खापरपणजोबांविषयी काय लिहायचं ते मीच सांगेन! बादशहाच्या आदेशानुसार नवा इतिहास लिहिण्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यानंतर चार दिवसांनी बादशहा आणि बिरबल सकाळी फिरायला गेले असताना बादशहाला ठेच लागली आणि त्याचं पायाचं बोट रक्ताळलं. राजवाडय़ावर परत आल्यावर बादशहाचा धाकटा मुलगा त्याच्या पायाकडे पाहत म्हणाला, ‘अब्बाजान, काय झालं?’ बादशहाला बोलण्याची संधी न देता बिरबल म्हणाला, ‘‘रस्त्यात एक साप आडवा आला, खाविंदांनी त्याला लाथेनं उडवलं. त्यामुळे बोटाला जखम झाली. मुलानं बापाकडे अभिमानानं पाहिलं आणि तो बापाचा पराक्रम आईला सांगण्यासाठी घरात पळाला. बादशहा विस्मयानं बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘अरे त्याला खोटं का सांगितलंस! खरं सांगितलं असतं तर त्या रस्त्यानं दगड आहेत, सांभाळून चाललं पाहिजे हे तरी त्याला कळलं असतं!’
बिरबल म्हणाला, ‘खाविंद, पुढं भविष्यात तुमचा एखादा खापर पणतू खोटा इतिहास लिहिल, त्यापेक्षा आपण आताच त्याची व्यवस्था केलेली बरी!’
अर्थात बादशहा हे ऐकून वरमला. त्याची ती स्थिती पाहून बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांमध्ये आणि समाजाच्या नेतृत्वामध्येच जर इतिहास पचवण्याची ताकद नसेल तर समाजात ती कुठून येणार? आणि इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?’ बादशहा हे ऐकून खिन्न झाला, कारण त्याची विवेकबुद्धी शाबूत होती.

No comments:

Post a Comment