Wednesday, January 26, 2011

महाराष्ट्राचा झाला बिहार

अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळले


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला इंधन भेसळखोरांचे कृत्य
‘महाराष्ट्राचा बिहार होऊ घातला आहे’ हे वाक्य आता इतिहासजमा झाले असून गुंडगिरीमध्ये आता महाराष्ट्राने बिहारला खूप मागे टाकले आहे, असे म्हणण्याची पाळी आली आहे. ‘कायद्याच्या राज्या’चे अस्तित्वच उरलेले नाही अशी भीषण घटना आज नाशिक जिल्ह्यातील पानेवाडी येथे घडली. भर रस्त्यावर इंधनतेलाची भेसळ करणाऱ्या गुंडांच्या टोळीला अटकाव करण्याचे धाडस दाखविणारे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना या गुंडांनी त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले. भर रस्त्यात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या जळितकांडाने संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. पानेवाडीत हे जळितकांड घडत असताना ठाण्यात राजकारणी व बिल्डरांचे काळे व्यवहार उघडय़ावर आणण्याचे धाडस दाखविणाऱ्या आणि माहिती अधिकार कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विक्रांत कर्णिक या कार्यकर्त्यांवर काही अज्ञात गुंडांनी पानेवाडीप्रमाणेच दिवसाढवळ्या आणि भररस्त्यातच प्राणघातक हल्ला केला. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येस पोलीस, न्यायालय, शिक्षा अशा कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता करण्यात आलेल्या हल्ल्याच्या या दोन घटनांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे जाहीरपणे टांगली गेली आहेत.

इंधन भेसळीला अटकाव करण्यासाठी गेलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे (४७) यांना अक्षरश: जिवंत जाळण्यापर्यंत भेसळखोरांची मजल गेल्याने त्याबद्दल सर्वत्र शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या अत्यंत घृणास्पद आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेचे तीव्र पडसाद प्रशासकीय पातळीवर उमटले असून त्याच्या निषेधार्थ येत्या २७ तारखेला राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रमुख संशयित पोपट शिंदे याच्यासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्याबरोबरच प्रसंगी मोक्का लावण्यासही मागेपुढे पाहिले जाणार नाही, असे घटनास्थळी भेट देणारे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी विजया, कुणाल व पंकज हे दोघे मुलगे, आई, वडील असा परिवार आहे.
मनमाड नजिकच्या पानेवाडी परिसरात सर्व प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांचे डेपो असून या भागातून राज्यात तसेच परराज्यातही बहुतांश भागात इंधन पुरवठा केला जातो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व घासलेट पुरवठय़ाच्या या केंद्राभोवतालचा परिसर भेसळखोरांचा अड्डा म्हणूनही परिचित आहे. हा परिसर मालेगाव महसूल मंडलाच्या अखत्यारित येतो. मंगळवारी, प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी दुपारच्या सुमारास मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे मनमाडहून नांदगावकडे निघाले असता परिसरातल्या जोंधळेवाडी येथे एका ढाब्यावर टँकर संशयास्पद अवस्थेत उभा असल्याचे त्यांना दिसले. इंधन भेसळीचा संशय आल्याने ते आपल्या शासकीय वाहनातून उतरून टँकरजवळ गेले असता काही जण टँकरमधून घासलेट काढताना दिसले. त्याला आक्षेप घेवून सोनवणे यांनी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता संबंधितांनी त्यांच्याशी हुज्जत घालणे सुरु केले. एकंदर परिस्थिती पाहून सोनवणे यांनी आपल्या भ्रमणध्वनीद्वारे भेसळीचे चित्रण सुरु केले व त्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते पाहताच भेसळखोरांपैकी दोघा-तिघांनी सोनवणे यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. सोनवणे यांच्यासमवेत असलेले त्यांचे स्वीय सहायक राजू काळे व चालक गवळी यांना देखील संबंधितांनी मारहाण सुरु केली. उभयतांनी तेथून स्वत:ची कशीबशी सुटका करुन घेतली व पळ काढला. तथापि, सोनवणे तेथेच कोसळले व घटनास्थळीच त्यांचा मृत्यू ओढवला. सोनवणे एवढे गंभीर भाजले होते की त्यांच्या मृतदेहाचा अक्षरश: कोसळा झाला. यावेळी झालेल्या झटापटीत प्रमुख संशयित पोपट शिंदे हा देखील भाजला असून त्याला मालेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. शिंदे याच्यासह अन्य दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण शासकीय यंत्रणा हादरून गेली. वरिष्ठ पोलीस व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी फौजफाटय़ासह घटनास्थळी धाव घेतली. पाठोपाठ जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे त्यांचे पुत्र पंकज, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी नेतेमंडळींनी देखील तातडीने तेथे भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले असून प्रसंगी मोक्कांतर्गत कारवाईचा इशारा देखील दिला आहे. या घटनेनंतर लगेच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडून सोनवणे यांच्या येथील निवासस्थानी धाव घेतली. सोनवणे येथील द्वारका परिसरात वास्तव्यास होते. या घटनेची माहिती समजल्यानंतर आ. वसंत गीते यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेवून कुटुंबियांचे सांत्वन केले.

यशवंत सोनवणे यांचा परिचय
नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे सोनवणे यांचे मूळ गाव. तल्लख बुद्धिमत्ता आणि अविरत काम करण्याची तयारी ही यशवंत सोनवणे यांची खासियत. याच बुद्धिमत्तेच्या जोरावर १९८८ मध्ये मंत्रालय सहायक म्हणून ते प्रथम शासकीय सेवेत दाखल झाले. त्यापुढील वर्षी त्यांची लेखा विभागात वित्त अधिकारी म्हणून निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १९९० मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली. अवघ्या तीन वर्षांत प्रत्येक परिक्षेत त्यांनी यशाची शिखरे अक्षरश: पादाक्रांत केली. नाशिक येथे परीविक्षाधीन सेवा बजावल्यानंतर त्यांनी कळवण व मालेगाव येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले. पुढे जळगावला भूसंपादन अधिकारी म्हणून काही काळ काम केल्यानंतर साधारणत: दोन वर्षांपूर्वी मालेगावच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर त्यांना बढती देण्यात आली. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी विजया तसेच कुणाल व पंकज हे दोघे अनुक्रमे ११ वी आणि ९ वी इयत्तेतील मुलगे असा परिवार आहे.

सोनावणेंच्या कुटुंबियांना मदत
यशवंत सोनावणे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना सोनावणे यांच्या निवृत्तीपर्यंतचे वेतनही देण्यात येणार असून घरातील एकाला नोकरीही देण्यात येणार आहे. तसेच सोनावणे यांच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्चही सरकारच्या वतीने करण्यात येणार असून त्यांना सरकारी सदनिकाही देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केले.

Link to original article - http://bit.ly/hj2hGQ

Saturday, January 15, 2011

आयपीएल : निष्ठा, प्रतिष्ठा की पैसा ?



आयपीएल : निष्ठा, प्रतिष्ठा की पैसा ?

निरनिराळ्या आयपीएल संघांकरिता खेळाडूंच्या खरेदीसाठी नुकताच जाहीर लिलाव करण्यात आला. या लिलावात अनेक नवोदित खेळाडूंवर कोटी-कोटींची बोली लावण्यात आली. ही खरेदी नेमकी कोणत्या निकषांवर होते, हे अजून अज्ञात आहे. हे असेच चालले तर एके दिवशी आयसीसी आणि भारतीय क्रिकेट बोर्डालाही डावलून हा खेळ संघमालक आपल्या खिशात घालतील, अशी लक्षणे आहेत. त्यामुळेच आयपीएलसंदर्भात सर्वसामान्यांच्या मनात अनेकानेक प्रश्न उपस्थित होत आहेत.. ‘आयपीएल ४’चा लिलाव ललित मोदींशिवाय संपला. ललित मोदी कार्यरत असताना मिळालेल्या प्रतिसादापेक्षाही मोठा प्रतिसाद यावेळी मिळाला. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग यांना मिळालेल्या रकमेपेक्षाही अधिक रक्कम गंभीर, युसूफ पठाण, रॉबिन उत्थप्पा, रोहित शर्मा, इरफान पठाण, युवराजसिंग, एवढेच नव्हे तर रणजी सामन्यातही आपला ठसा न उमटविणाऱ्या सौरभ तिवारीला मिळाली. गुरंढोरं विक्रीच्या बाजाराप्रमाणे क्रिकेट-विक्रीच्या या बाजाराच्या थेट प्रक्षेपणाचेही यावेळी मार्केटिंग झाले. आयपीएल हे आता केवळ क्रिकेट उरलेले नाही. आयपीएल हा मोठा उद्योगधंदा बनला आहे. २०११ च्या या लिलावाचे स्वरूप पाहिले तर उद्योगाच्याही पलीकडे हे क्रिकेट चालले आहे, याची जाणीव होते. ती एक प्रवृत्ती बनत चालली आहे. उद्योगजगतातल्या अंबानी, मल्ल्या, वाडिया, सहारा यांच्यासारखे दादा लोक आयपीएल क्रिकेट बोर्डाच्या दावणीतून कधी सुटका होऊन ते मोकाट सुटतील, हे यापुढे कुणालाही सांगता येणार नाही.
उद्योगपतींच्या मुजोर प्रवृत्तीचे दर्शन आयपीएलने अधूनमधून घडविले आहेच. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा, सर्वोच्च शतके झळकविणारा सचिन तेंडुलकर मोठा की काल-परवा आलेले, कसोटी क्रिकेटचा टिळाही न लागलेले रोहित शर्मा, सौरभ तिवारी हे मोठे, हे यापुढे मल्ल्या, अंबानी, सहारा, प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, गायत्री राव हीच मंडळी ठरवणार आहेत. गौतम गंभीरची लिलावातील किंमत ११.४ कोटी रुपये कशाच्या आधारे ठरविण्यात आली, याचे उत्तर सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे आहे. रॉबिन उत्थप्पा गेले कित्येक महिने भारतीय संघात समाविष्ट होऊ शकलेला नाही. पण त्याला लिलावात आलेला भाव आहे- ९.६६ कोटी एवढा प्रचंड. सौरभ तिवारी, इरफान पठाण यांनी तर यंदा रणजी स्पर्धाही गाजविल्या नाहीत, पण त्यांच्या खिशातही आठ व सहा कोटींपेक्षा अधिक पैसे पडले आहेत. इरफान पठाण तर वर्षभर बडोदे क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरदेखील फिरकला नाही. कारण तो क्रिकेट खेळण्याइतपत तंदुरुस्तच नाही. सध्या तो बंगळुरूमध्ये फिटनेससाठी धडपडतोय. पण अशा खेळाडूसाठीही आठ कोटी ८७ लाखांपर्यंतची बोली लागली.
सारेच अनाकलनीय आहे! शेअर मार्केटवर नियंत्रण करणारी आणि ते हलविण्याची क्षमता असलेली ही मंडळी क्रिकेट कोणत्या थराला घेऊन जाणार आहेत, याचीच ही झलक आहे. आयपीएल ही उद्योजकांना सापडलेली पैसे कमावण्याची खाण आहे. या खाणीतून पैसा काढताना क्रिकेटची नीतीमूल्ये पायदळी तुडवण्यास सुरुवात झाली आहे. ललित मोदींच्या पश्चातदेखील या स्पर्धेला प्रचंड पुरस्कर्ते लाभले आहेत. प्रचंड पैसा तीत आला आहे. प्रेक्षकांचा पाठिंबाही प्रचंड आहे. अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट, एवढेच नव्हे तर आयसीसीच्या स्वत:च्या असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप आदी स्पर्धानादेखील आयपीएल यापुढे झाकोळून टाकू शकेल, अशी शक्यता आतापासूनच दिसायला लागली आहे.
हे आयपीएल आयसीसीच्या अस्तित्वालाच उद्या आव्हान देऊ शकेल. कारण त्यांना कुणाचीही बंधने नको आहेत. स्वत:चा स्वतंत्र कार्यक्रम त्यांना राबवायचा आहे. भारतीय संघ नसला तरीही ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेटला प्रेक्षक मोठय़ा प्रमाणावर येतात, हे फ्रॅन्चायझींच्या मालकांना कळून चुकले आहे. त्यामुळेच हा आगामी धोका ओळखून भारतीय क्रिकेट बोर्डाने संघमालकांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. खेळाडूंचे गेल्या दोन वर्षांचे मानधन न देणाऱ्या पंजाब संघाचा नफ्यातील सर्व हिस्सा क्रिकेट बोर्डाने अडकवून ठेवला होता. असे नाक दाबल्यामुळेच त्या संघाचे तोंड उघडले. युवराजसिंग, इरफान पठाण, कुमार संगकारा आदी खेळाडूंना थकित मानधन मिळाले.
ललित मोदी यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या काही फ्रॅन्चायझींनाही क्रिकेट बोर्डाने मागे सरळ केले होते. पण तांत्रिक बाबींपुरतीच ही लढाई मर्यादित होती. आयपीएल किंवा ट्वेन्टी-२० मुळे होणारे क्रिकेटचे नुकसान आयसीसी किंवा भारतीय क्रिकेट बोर्डालाही आता रोखता येणार नाही. कारण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी यापुढे क्रिकेटचे अधिकाधिक विकृत स्वरूपात विडंबन केले जाण्याची शक्यता आहे. ललित मोदी यांनी ‘चीअरगर्ल्स’च्या नावाखाली आंबटशौकिनांची अपेक्षा वाढविली आहेच. फलंदाजाने मारलेल्या चौकार-षटकारापेक्षाही त्यानंतर नाचणाऱ्या या क्रिकेट-बालांचे तोकडय़ा कपडय़ांमधील नृत्य पाहण्यासाठीचा उत्साहच अधिक असते. प्रत्येक वेळी आयपीएल अशा नवनव्या कल्पना घेऊन अवतरणार आहे. दोन डावांच्या मधील वेळेचा बॉलीवूड स्टार्सच्या नृत्यांसाठी वापर करण्याचीही कल्पना आहे. गुलामांप्रमाणे बोली लावून विकत घेतलेल्या या क्रिकेटपटूंना वागणूकही तशीच देण्यात येत आहे. साडेतीन तास संघर्षमय क्रिकेट खेळून थकल्या-भागल्या खेळाडूंना मध्यरात्रीच्या पार्टीला हजेरी लावणे सक्तीचे आहे. मागे एकदा भारताच्या दोन माजी कप्तानांनी थट्टेने म्हटले होते की, ‘सामना पाहतानाही काही महागडय़ा स्टॅण्ड्समध्ये आम्हाला व राखीव खेळाडूंना बसविण्याची आग्रही विनंती होती. हे मालक लोक आणखी जास्त पैसे मिळतात म्हणून आमच्या मांडीवर बसून सामना दाखविण्याची शक्कलही लढवू शकतील.’ यातील अतिशयोक्तीचा आणि विनोदाचा भाग सोडला, तरीही भारताचे दोन माजी कप्तान आपल्या संघमालकांची मजल कुठवर जाऊ शकते, याबद्दल काय विचार करतात, हेच यातून स्पष्ट होते.
आयपीएलमधील आणखी एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. ते म्हणजे- खेळाडूंची किंमत ठरविण्याची पद्धत! ती कोण ठरवतो, तेही गुलदस्त्यातच आहे. तीन वर्षांपूर्वीच्या लिलावामध्ये बहुतांशी खेळाडूंना विकत घेताना संघमालक व त्यांचे भागीदार यांचाच प्रभाव जास्त जाणवत होता. त्यांनी मोठमोठी नावे असलेले खेळाडू घेण्यासाठी उडय़ा टाकल्या होत्या. तीन वर्षांनंतर हे मालक शहाणे झालेले दिसताहेत. यावेळी मोठय़ा खेळाडूंच्या मागे न धावता त्यांनी खेळाडूंच्या उपयुक्ततेचादेखील विचार केलेला दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यावेळी त्यांनी आपल्या ताफ्यातील क्रिकेट जाणकारांचा सल्ला विचारात घेतला आहे. प्रत्येक संघाकडे कर्मचारीवर्गही मोठा आहे. पडद्याआडचे हे कलाकार आपल्याला दिसत नाहीत. पण आयपीएल फ्रॅन्चायझी एखाद्या कंपनीप्रमाणे संघाचा स्वतंत्र कारभार पाहतात. प्रमुख प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण यासाठी वेगवेगळे मार्गदर्शक, खेळाडूंचा फिझिओ वेगळा, ट्रेनर वेगळा, मॅनेजर वेगळा, ग्राऊंड स्टाफ वेगळा. प्रत्येक संघाचा सीईओ असतो. तो क्रिकेट मैदानावरची आणि मैदानाबाहेरची व्यवस्थाही पाहत असतो. त्याला वेगवेगळ्या विभागांची कामे करण्यासाठी सहाय्यक असतात. स्टेडियमवरील व्यवस्था पाहणे, आपल्या संघाची नेटस् लावणे, सरावाची व्यवस्था पाहणे, खेळपट्टी कशी असावी आणि त्यानुसार ती करून घेणे, याकडेही त्याला लक्ष द्यावे लागते. त्यासाठी क्युरेटरची स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात येते. दुसरा विभाग स्टेडियमवरील जाहिरातींकडे लक्ष पुरवीत असतो. त्या जाहिराती, पुरस्कर्ते आणणारे लोक वेगळे असतात. एक विभाग तिकीट विक्री, तिकिटांचे दर ठरवणे, ती छापून घेणे, पुरस्कर्ते व सर्वसंबंधितांपर्यंत पोहोचविणे हे काम पाहत असतो. प्रत्येकाचे पुरस्कर्ते वेगवेगळे असतात. त्यांना जपणारा विभाग वेगळा असतो. प्रत्येक संघाला आपल्या संघातील दिग्गज खेळाडूंचे मार्केटिंगही करायचे असते. त्यासाठी जाहिरातदार मिळविणे, स्वत:च्या ब्रॅण्डच्या जाहिराती करणे, यावर त्यांना काम करावे लागते. एक विभाग असा असतो की, जो सामन्याच्या पाश्र्वभूमीवर आणखी पैसे कसे कमावता येतील, याची योजना आखत असतो. अंतिम सामन्यानंतर किंवा प्रत्येक सामन्यानंतरची मेजवानी हा त्याचाच एक भाग आहे. धनाढय़ क्रिकेटशौकिन अशा डिनर पाटर्य़ावर लाखो रुपये उडवतात. त्या पाटर्य़ाना आकर्षित करण्याचे काम एक विभाग करीत असतो. आवडत्या खेळाडूसोबत डिनर घ्यायला मिळणे, या आनंदासाठी लाखो रुपये मोजणारे एकीकडे असतात; तर दुसरीकडे नाइलाजाने, बळेबळे या डिनर पार्टीला हजेरी लावणारे खेळाडू असतात. मागे अनेकांनी अशा पाटर्य़ाना जाणे टाळले होते आणि आपल्या संघमालकांचा रोष पत्करला होता.
सुमारे दीड महिना चालणाऱ्या या आयपीएल उद्योगामागे प्रत्येक संघाचा सुमारे १०० ते ३०० जणांचा कर्मचारीवर्ग राबत असतो.
आयपीएल गेट मनी हादेखील खेळाडूंच्या लिलावातील किमतीप्रमाणेच न कळणारा प्रकार आहे. कारण सर्वसामान्य प्रेक्षकांना ही तिकिटे मिळत नाहीत. स्टेडियमवर तिकिटे विकली जात नाहीत. पुरस्कर्ते आणि कॉर्पोरेट मित्रांमार्फतच या तिकिटांचे वाटप, वितरण होत असते. त्यामुळे तेथे पहुंॅच असणाऱ्यांनाच तिकिटे मिळतात. आणि टंचाई भासली की मागणी वाढते, या न्यायाने तिकिटांच्या किमती वाढत जातात. कधी कधी तिकिटे संपल्याचे सांगण्यात येते, परंतु स्टेडियममधील स्टॅण्ड्स रिकामेच असतात. आयपीएलचा आभास हा असा आहे!
सचिन तेंडुलकरची किंमत त्याने निवडलेल्या खेळाडूंपेक्षा कमी असू शकते का? जॅक कॅलिस, ग्रॅमी स्मिथ, केव्हिन पीटरसन यांच्या किमती रणजी खेळाडूंपेक्षा कमी असू शकतात, हा विचारदेखील पटत नाही. खेळाडूंना मिळणारी रक्कम त्यांच्या खेळाच्या दर्जाच्या योग्यतेनुसार आहे, त्यांच्या प्रतिभेला अनुसरून आहे, की संघमालकांच्या चाणक्यांनी ठरविलेल्या निकषानुसार आहे? आयपीएलच्या अनपेक्षित यशाप्रमाणेच या प्रश्नांची उत्तरेदेखील अज्ञातच आहेत.
आता अन्य खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. ३० लाख वार्षिक किंमत निश्चित केलेल्या अंबाती रायडूला त्यापेक्षा तिप्पट पैसे देऊन घेण्याची तयारी मुंबई इंडियन्सने दाखविली होती. आता मुंबईकडून आठ आकडी पैसे मोजून त्याला घेण्यासाठी बंगळुरू संघ पुढे सरसावला आहे. अशाने खेळाडूंची निष्ठा नेमकी कुठे राहील? पैशाप्रती की त्याच्या राज्याच्या संघाप्रती? कारण मुंबईसह कुणीही आपापल्या खेळाडूंना मोठय़ा प्रमाणावर घेण्यात रस दाखवलेला नाही. अगदी आपल्या तेंडुलकरनेदेखील!

Link to original Article
http://bit.ly/dEKxCN

Sunday, January 2, 2011

माणसाच्या अस्तित्वाचे रुपांतर आठवणींमध्ये होते


बादशहाच्या अब्बाजानचा इंतकाल झाला. त्यांचं वय झालं होतं आणि अनेक व्याधींनी त्यांना घेरलं होतं. वेदनांमधून त्यांची सुटका झाली, मृत्यूनं त्यांना जवळ केलं. बादशहाचा महाल शोकसागरात बुडाला. बादशहानं अन्नपाणी सोडलं आणि तिसऱ्या दिवशी स्वत:ला एका कक्षात कोंडून घेतलं. बेगम संचित झाल्या, मंत्रिमंडळ काळजीत पडलं, प्रजा भयभीत झाली. बिरबलानं सर्वाना धीर दिला आणि तात्पुरती राज्याची सूत्रं स्वत:कडे घेतली. बादशहाच्या दु:खाची तीव्रता कमी होऊन तो स्वत:च बाहेर येईल यासाठी चार दिवस वाट पाहिली; परंतु बादशहा दु:खाच्या आवर्तनातून बाहेर येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. अखेर बिरबलाने एका कागदावर बादशहाला पत्र लिहिले. ‘खाविंद, आपले दु:ख आम्ही समजू शकतो, परंतु आपण बादशहा आहात, लाखोंचे पोषिंदे आहात याचा विसर पडू देऊ नका. एखादी व्यक्ती, एखादी वस्तू जाते, म्हणजे ती पूर्णपणे जात नाही, तिचे फक्त रुप बदलते, अस्तित्व संपत नाही. तेव्हा अब्बाजानचा इंतकाल म्हणजे त्यांचा अंत, असे समजू नका.’

बिरबलाचे पत्र वाचून बादशहाने आपले दु:ख आवरते घेतले आणि तो बाहेर आला. राज्याचा गाडा पूर्ववत सुरू झाला. काही दिवस गेले. बादशहा आणि बिरबल एका संध्याकाळी मावळता सूर्य पाहत बसलेले होते, तेव्हा बादशहाने बिरबलाच्या पत्राचा विषय काढला आणि म्हणाला, ‘माणूस संपला की सगळे संपतेच रे बिरबल!’ बिरबल छान हसला आणि म्हणाला, ‘माफी असावी खाविंद, कुठलीच गोष्ट संपत नाही. इथे सूर्य मावळताना दिसतो तेव्हा तो कुठेतरी उगवत असतो. लाकूड जळून कोळसा होतो. कोळसा जळून राख होते. पाणी वाहून जाते ते कुठेतरी जातच असते. वस्तूचे फक्त रुप, आकार, रंग, अवस्था बदलत असतात!’ बिरबलाकडे रोखून पाहात बादशहा म्हणाल, ‘आणि मनुष्याचे काय उरते?’
बादशहाचे दोन्ही हात आपल्या हाती घेत बिरबल हळव्या स्वरात म्हणाला, ‘माणसाच्या अस्तित्वाचे रुपांतर आठवणींमध्ये होते खाविंद! अब्बाजान तुमच्या आठवणींमधून कधी पुसले जाणार आहेत का?’ बादशहानं आंसूभरल्या डोळ्यांनी बिरबलाला मिठीत घेतलं आणि त्याचं अस्तित्व महसूस केलं. त्यांच्या मिठीतून बाहेर येत बिरबल म्हणाला, ‘मीही गेलो तर असाच शिल्लक राहीन, तुमच्या स्मृतिंमध्ये!’ बादशहा अकबर कातर स्वरात म्हणाला, ‘खबरदार, असं काही बोललास तर!’ पायात आपले बूट चढवत बिरबल म्हणाला, काळजी करू नका, तुम्ही गेल्यावर तुमच्याही आठवणी राहतील, निसर्गाचे नियम सगळ्यांना सारखेच लागू होतात!’ वास्तवाच्या जाणिवेनं येणारी एक अनोखी उदासी बादशहाच्या चेहऱ्यावर दाटून आली! बिरबल निघून गेला.
धन्यवाद लोकसत्ता ... ....    Link to original article