Sunday, February 7, 2010

भावनांचं राजकारण हे अंमली पदार्थाच्या सेवनासारखं असतं

‘जो या राज्यात जन्मला तोच या राज्याचा, बाकी सर्व उपरे!’ एका तरुण नेत्यानं जोरदार गर्जना केली. लाखो हातांनी टाळ्यांचा कडकडाट केला. समूहाच्या मनात जणू ‘आपण कुणीतरी खास आहोत’ अशी रोमांचक भावना निर्माण झाली. या भावनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले. बादशहाकडे या बातम्या पोहोचत होत्या व हळूहळू त्याची अस्वस्थता वाढत होती. ‘सलग १५ वर्षे ज्याचे वास्तव्य या राज्यात आहे तो अधिकृत’ असं एकेकाळी म्हटलं जात होतं. परंतु अलिकडे ‘आपला आणि उपरा’ यांच्या व्याख्या बदलल्या, स्वरूपही बदलले होते. त्यामुळं सलोख्याला सुरूंग लागला होता. काहीतरी करायला हवं, असं बादशहाला वाटू लागलं आणि त्यानं बिरबलाला बोलावणं पाठवले. ‘सगळं काही आलबेल आहे, बादशहानं कशाला बरं बोलावलं असेल’ असा विचार करीत बिरबल बादशहाकडे पोचला. ‘खाविंद, आपण याद केलीत माझी?’
बादशहा म्हणाला, ‘मला फार काळजी वाटते आहे, राजधानीतलं वातावरण गढुळलं आहे, मनामनात अदृश्य भिंती उभ्या राहत आहेत.’
बिरबल म्हणाला, ‘खाविंदांनी निश्चिंत असावं, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे!’
बादशहाला बिरबलाचं उत्तर ऐकून आश्चर्य वाटलं. ‘अरे, जो या राज्यात जन्मला तोच इथला, अशी अतिरेकी घोषणा देण्यापर्यंत मजल गेली आहे, आणि तू म्हणतोस मी निश्चिंत असावं!’
बिरबल हसला आणि म्हणाला, ‘खाविंद, भावनांचं राजकारण हे अंमली पदार्थाच्या सेवनासारखं असतं. त्याचा डोस सतत वाढवत राहावा लागतो. आणि एक वेळ अशी येते की, डोस कितीही वाढवला तरी त्याची किक बसत नाही. म्हणूनच म्हटलं, डोस वाढवला जातोय म्हणजे अगदी योग्य दिशेनं चाललं आहे राजकारण!
बिरबलाचा हा तर्क ऐकून बादशहा गोंधळला. जरा अविश्वासानंच म्हणाला, ‘पण खरंच असं होईल?किक बसणार नाही,अशी वेळ येईल? बिरबल शांत स्वरात म्हणाला, ‘खाविंद या नेत्याच्या पूर्वसूरींना अखेर अंमली पदार्थाचा ब्रँड बदलून राजकारण करण्याची वेळ आली होती हे विसरू नका!’ आणि मग बादशहा निर्धास्त झाला व म्हणाला, ‘चहा नामक मादक पेय चालेल का तुला आत्ता?’ अर्थात बिरबलाने ते आमंत्रण आनंदाने स्वीकारलं!

No comments:

Post a Comment