Monday, February 1, 2010

एनी पब्लिसिटी इज ए गूड पब्लिसिटी

गेले काही दिवस राज्यात मोठाच गदारोळ सुरू झाला होता. वृत्तपत्रे, वाहिन्यांवर एक चर्चा सुरू होती. अमूक चित्रपटातील दृश्यांवर एका नेत्याने कात्री चालवणे भाग पाडले. मग त्या चित्रपटाचे खास खेळ रोज वेगवेगळ्या नेत्यांसाठी होऊ लागले. कधी त्या नेत्याचा एखाद्या संवादावर आक्षेप असे तर कधी त्या नेत्याचे भक्त दुखावत. मग त्यांच्या मर्जीप्रमाणे चित्रपटात बदल करत असल्याची घोषणा केली जात असे. नेते आणि त्यांचे भक्त सदैव तोडफोडीची भाषा करत प्रसंगी तोडफोड करीतही होते.
मग एका चित्रपटाच्या शिर्षकावर कोणाची तरी खप्पामर्जी झाली. पुन्हा धमकावण्याची भाषा, ‘अमूक करू, तमूक करू’ची भाषा. निर्मात्याची धावाधाव आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची हाती पेन धरून किंवा माईक धरून धावपळ.हे सगळं पाहून बादशहा जाम वैतागला. ‘चित्रपटात काय दाखवणं योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी एक समिती आहे ना नेमलेली, मग हे सगळं कशासाठी?’ असं बादशहा करवादून म्हणाला. बिरबलानं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक यांची अवस्था, नेत्यांची उद्दाम भाषा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नव्यानं होत असलेली चर्चा यामुळं बादशहा सतत त्याच गोष्टींचा विचार करत होता.
अखेर बादशहानं बिरबलाला विचारलं, ‘यावर आपण काही तरी करावं, या हस्तक्षेपाला पायबंद घालावा, असं तुला नाही का वाटतं?’
बिरबल म्हणाला, ‘खाविंद, आज घडीला जेवढय़ा चित्रपटांची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे त्यातील दहा चित्रपटांची नावं काढूया.’ तशी काढण्यात आली. मग बिरबल म्हणाला, ‘आता आपले गुप्तहेर या दहा निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या घरी पाठवा आणि अहवाल मागवा.’ बादशहाने बिरबलाची ती सूचनाही अंमलात आणण्याचे फर्मान सोडले. अहवाल आल्यावर बिरबलाने गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाला विचारले, ‘आपला निष्कर्ष सांगा.’ बादशहाला कुर्निसात करून गुप्तहेर प्रमुख म्हणाला, ‘जहांपनाह, हे सर्वच्या सर्व दहा निर्माते रोज देवाला प्रार्थना करीत आहेत, देवा, आमच्या चित्रपटाबद्दलही काही तरी वाद होऊ देत!’
बादशहाला आश्चर्य वाटलं. बिरबल म्हणाला, ‘एनी पब्लिसिटी इज ए गूड पब्लिसिटी, हे आजचं घोषवाक्य आहे खाविंद. अशी प्रसिद्धी झाली की लोक चित्रपटाला हमखास गर्दी करतात. त्यामुळं हे प्रकार अनेकदा संगनमतानं होतात. कधी कधी ते खरेही असतात.’
बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘अल्लाह, हे असे आहे तर! मग लोकशिक्षणाची खरी गरज आहे.’
बिरबल हसत हसत म्हणाला, ‘खाविंद, लोकशिक्षण हे आयुर्वेदासारखं आहे, एक तर त्याचा प्रभाव जाणवायला काळ जावा लागतो आणि दुसरं म्हणजे, त्याची मात्रा  प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी द्यावी लागते!’
आयुर्वेदाची उपमा बादशहाला बेफाम आवडली. तो हसत हसत बिरबलाला म्हणाला, ‘चल, काढा घेऊ या!

No comments:

Post a Comment