Wednesday, January 20, 2010

लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!

नागरिकांनी मतदानासाठी मोठय़ा प्रमाणात बाहेर पडावे, मतदानाच्या दिवशी पिकनिकला वगैरे जाऊ नये, भयमुक्त मतदान करावे म्हणून स्वत: बादशहा आवाहन करत होता. बिरबलानेही ठिकठिकाणी सभा घेऊन नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. परंतु एका बुद्धिवाद्याने या उलट प्रचार सुरू केला. ‘सगळे उमेदवार भ्रष्ट आहेत, खोटारडे आहेत, मतलबी आहेत, तेव्हा मतदान करू नका.’ सामान्य माणूस अनेकदा आवश्यक असेल तेव्हा चिरीमिरी देऊन स्वत:ची कामे करून घेतो, परंतु नेत्यांच्या भ्रष्ट आचाराविषयी जागरूक असतो. त्यामुळं, मतदानाला विरोध करणाऱ्या बुद्धिवाद्याच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला. ते पाहून बादशहा काळजीत पडला. बिरबलही विचारात पडला. मग बिरबलानं त्याची चौकशी यंत्रणा कामाला लावली. चौकशी पूर्ण झाल्यावर बिरबलानं बुद्धिवादी नेत्याला भोजनाचं निमंत्रण दिलं. गप्पा-टप्पा, चर्चा असं बरंच काही झाल्यावर रात्री उशीरा सगळ्यांना सपाटून भूक लागली. मग जेवण वाढलं जाऊ लागलं. बुद्धिवाद्याकडे पाहून बिरबल म्हणाला, ‘माफी असावी. आपण नॉनव्हेज खात नाही आणि व्हेजमध्ये सुध्दा तुमची नावडती वांग्याची, भेंडीची भाजी आहे. तेव्हा आपण आज जेवला नाहीत तरी चालेल!’ बुद्धिवादी म्हणाला, ‘अहो, आता एव्हढय़ा रात्री निवड करायला कुठं वेळ आहे, पोट भरलं नाही तर शरीराची यंत्रणा कशी चालेल?’ बिरबल हसत हसत म्हणाला, ‘माझंही तेच म्हणणं आहे. लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!’ बुद्धिवादी खजिल झाला आणि त्यानं मसाल्याची वांगी ताटात वाढून घेतली. अर्थातच मतदानविरोधी चळवळ त्यानं बंद केली. बिरबलाची ‘डिनर डिप्लोमसी’ बादशहाला बेफाम आवडली आणि त्यानं बिरबलाला ‘रेशमी कबाब’चा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केलं!

No comments:

Post a Comment