Showing posts with label paper eye opener. Show all posts
Showing posts with label paper eye opener. Show all posts

Sunday, September 5, 2010

मुलांच्या निरागस भावविश्वाला वास्तवाचे चटके देणं म्हणजे सगळा आनंद घालवणं आहे

राज्यभर सगळीकडे धुवाँधार पाऊस सुरू होता. सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सगळे व्यवहार थंडावले होते. रस्त्यांवर वर्दळ नव्हती. दुकाने बंद होती. बादशहा आपल्या महालाच्या नक्षीदार झरोख्यातून आभाळाची माया बरसताना पाहत होता. भरपूर पाऊस पडत असल्याने तो वारंवार परवर दिगारचा शुक्रियाही अदा करीत होता. एकूणच काही कामकाज नसल्याने तो दोन बेगम व त्यांच्या मुलांसाठी वेळ देत होता. मुलांनी आग्रह केला तेव्हा त्यांनी त्यांची गोष्टीची पुस्तके वाचली. जादूच्या, राक्षसांच्या, राजा-महाराजांच्या, राजपुत्रांच्या, शूरवीरांच्या अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी त्याने मजेने वाचल्या आणि मग अचानक त्याच्या लक्षात आले, सर्व गोष्टींचे शेवट ‘आणि ते सुखाने नांदू लागले’ असाच असे. बादशहा विचार करू लागला आणि मग त्याला ते अधिकच खटकू लागले. त्याने सांस्कृतिक मंत्र्याला तातडीने बोलावून घेतले व ‘बाल साहित्याची स्थिती कशी आहे?’ असा प्रश्न केला. मंत्री खरे तर हादरलाच. बादशहाला अचानक बाल साहित्याच्या स्थितीची चिंता का पडावी आणि त्याच्या मनात नेमके काय आहे ते त्याला कळत नव्हते आणि तसे स्पष्ट सांगण्या- विचारण्याचीही सोय नव्हती. मंत्री कामाला लागला व त्याने दोन दिवसांत बादशहाला आपला अहवाल सादर केला. ‘‘हुजूर, आपल्या राज्यात बालकथा लिहिणारे साधारणत: पाचशे लेखक आहेत. वर्षभरात जवळपास ३ हजार पुस्तके प्रकाशित होतात आणि त्यातल्या उत्कृष्ट पुस्तकांना आपण पुरस्कारही देतो’’ बादशहानं नाराजीनं मान हलविली आणि म्हणाला, ‘‘यापैकी बहुतांश कथांचे शेवट.. आणि ते सुखानं नांदू लागले.. अशा वाक्यानं होतो. लहान मुलांची ही दिशाभूल आहे. दु:ख, निराशा, अपयश, अपेक्षाभंग हा जीवनाचा एक भाग आहे हे त्यांना कळू द्या, सर्व लेखकांना तसे आदेश द्या.’’ मंत्री हवालदिल झाला आणि मान हलवून ‘जी खाविंद’ म्हणाला. आठवडाभरानं पाऊस जरा कमी झाला आणि मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा बादशहानं मंत्र्याला पुढील कारवाईबाबत विचारणा केली. मंत्र्यानं बिरबलाकडे पाहिलं तेव्हा बिरबलानं त्याला, काळजी करू नकोस, असं नजरेनंच सांगितलं. बैठक संपल्यावर बिरबल बादशहाच्या समवेत राजवाडय़ावर गेला. त्याच्या आदेशाप्रमाणं तिथं एक नक्षीदार पेटी आधीच आणून ठेवलेली होती. बिरबलानं इशारा करताच सेवकांनी ती पेटी उघडली आणि सोनेरी नक्षीनं वेढलेली बादशहाची एक तस्वीर त्यातून काढली. बिरबलानं तसबिरीला हार घातला, समोर उदबत्त्या लावल्या आणि हात जोडले. ते पाहून बादशहा लाल होऊन संतापानं थरथरू लागला. ‘बिरबल, तू काय चालविलं आहेस हे?’ बिरबल शांतपणे म्हणाला, ‘हुजूर, मी, तुम्ही, आपण सगळेच कधी तरी मरणार आहोत. तुमच्या मुलांना आपण आताच हे सत्य सांगून टाकावं असं वाटलं मला!’ अर्थातच सर्व प्रकार बादशहाच्या ध्यानी आला व तो वरमला. बादशहाची ती मुद्रा पाहून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, मुलांच्या निरागस भावविश्वाला वास्तवाचे चटके देणं म्हणजे सगळा आनंद घालवणं आहे. जगात खूप काही चांगलं आहे, अशी आशा त्यांच्या मनात निर्माण करणं आवश्यक असतं, ती मोठी होतात आणि या आशेच्या बळावरच वास्तवाला सामोरी जातात!’’ बादशहा म्हणाला, ‘सुखानं नांदू लागले’चं महत्त्व मला खरंच कळत नव्हतं. बिरबल हसत म्हणाला, ‘‘खाविंद, लहान मुलांच्या पुस्तकांविषयी तुम्ही एवढय़ा गांभीर्यानं विचार केला ते मला जास्त महत्त्वाचं वाटलं.’’ ढगाळ वातावरणात उत्तम प्रतीचा चहा घेण्यासाठी बिरबलानं मग आग्रह करून शिक्षण मंत्र्यालाही बोलावून घेतलं!

धन्यवाद लोकसत्ता ... ....    Link to original article

गोविंदा ... दहीहंडी : मूठभर निराशेतली चिमूटभर आशा !

पावसामुळं सगळे व्यवहार थंडावलेले होते. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीला उपस्थित असलेले सर्व मंत्रीही आळसावलेले होते. सगळं वातावरण असं सुस्तावलेलं पाहून बादशहानं रेशमी कबाब बनविण्याचा आदेश दिला. खमंग कबाब आणि पुदिन्याची ताजी पाने चांदीच्या नक्षीदार थाळ्यांमध्ये आली तेव्हा मग शेरो-शायरी गप्पा यांना ऊत आला. एकेक मजेदार किस्से सांगितले जाऊ लागले आणि वातावरण अगदी खुमासदार झाले. मध्येच बादशहानं हात उंचावला आणि म्हणाला, ‘तुम्हा सगळ्यांनाच माझा एक प्रश्न आहे, ज्याचं तुम्ही उत्तर द्यायचं ते लगेच सिद्धही करून दाखवायचं आणि उत्तर वैशिष्टय़पूर्णही हवं!’ सर्व मंत्र्यांनी एका स्वरात उत्तर दिलं, ‘कुबुल खाविंद!’ मग बादशहानं मसालेदार चहाचा एक घोट घेतला व आपला प्रश्न विचारला, ‘जगण्यासाठी काय हवं असतं?’ सर्व मंत्री, हा म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर अवघड प्रश्न ऐकून विचारात पडले. प्रश्नाचं उत्तर लगेचच सिद्ध करणं हे एक मोठं आव्हान होतं. अखेर एक ज्येष्ठ मंत्री उभा राहिला आणि म्हणाला, ‘खाविंद, जगण्यासाठी सुख हवं असतं असं मला वाटतं, परंतु ते आत्ता लगेच सिद्ध नाही करता येणार!’ बादशहा म्हणाला, ‘सुखाचा लवकरच कंटाळा येतो हे सार्वकालिक सत्य आहे.’ प्रत्येक मंत्री मनातल्या मनात बादशहाच्या प्रश्नाचं उत्तर जुळवत होता; परंतु ते उत्तर लगेचच सिद्ध कसं करावं हा पेच त्याला पडत होता. अखेर सर्व मंत्री बिरबलाला आग्रह करून म्हणाले, ‘आता तूच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकशील.’ मग बादशहानंही आग्रह धरला तेव्हा बिरबल म्हणाला, ‘जगण्यासाठी मूठभर निराशा आणि चिमूटभर आशा हवी असते आणि यात कोणत्याही काळात बदल झालेला नाही, होणारही नाही.’ बादशहानं उत्तरावर समाधान व्यक्त केलं आणि म्हणाला, ‘परंतु हे तू आत्ताच्या आत्ता सिद्ध कसं करून दाखवशील?’ बिरबल म्हणाला, ‘दाखवतो, पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत इथून बाहेर पडावं लागेल.’ मग सगळेच तिथून एकत्र बाहेर पडले. बाहेर एका चौकात प्रचंड गर्दी होती. लोक मद्यधुंद, बेहोष होऊन नाचत होते. चौकाच्या मध्यभागी पन्नास लाखांची दहीहंडी बांधलेली होती. त्या गर्दीला गोविंदाच्या सांस्कृतिक परंपरेशी काही देणं-घेणं नव्हतं. सर्वाचं लक्ष होतं पन्नास लाखांवर! ते पाहून बादशहा भयंकर निराश झाला. मग बिरबल बादशहाला घेऊन दुसऱ्या एका चौकात गेला, तिथं दहीहंडीला पैसे वगैरे नव्हते, फक्त दहीकाल्याचे मटके बांधलेले होते, काही लोक उत्साहाने पाणी फेकत होते, परंतु गर्दी नव्हती. खरं तर शुकशुकाटच होता. ते पाहून बादशहा म्हणाला, ‘पैसे नसूनही गोविंदा मंडळं थर उभारताहेत ही केवढी आनंदाची गोष्ट आहे!’ बिरबल म्हणाला, ‘‘यालाच मी मूठभर निराशेतली चिमूटभर आशा म्हणतो!’ बिरबलाच्या या उत्तरानं खूश झालेल्या बादशहानं संपूर्ण मंत्रिमंडळालाच आग्रहानं दुपारच्या शाही खान्यासाठी थांबवून घेतलं!

धन्यवाद लोकसत्ता ... ....    Link to original article

Saturday, July 10, 2010

भोपाळ दुर्घटना - Eye ओपनर in a different way



 "मुंबई विमानतळ हे याबाबतचे आणखी एक उदाहरण. विमान अपघात हे बहुदा विमान उतरताना वा उड्डाणाच्यावेळी होतात. उंचावर विमान असताना क्वचितच अपघात होतो. मुंबई विमानतळावर उतरण्याचा विमानाचा मार्ग हा अत्यंत दाट लोकवस्तीवरून जातो. मंगलोर येथे घडली तशी दुर्घटना मुंबई विमानतळावर झाली असती तर मृतांचा आकडा कित्येक हजारांत गेला असता. वस्तीवर विमाने पडण्याचे काही अपघात अमेरिकेत झाले आहेत, पण तेथील वस्ती विरळ असल्यामुळे जमीनीवरील मृतांची संख्या कमी होती. मुंबईत तसे होणार नाही. विमानातील प्रवाशांपेक्षा कित्येक पट जास्त माणसे जमीनीवर मृत्युमुखी पडतील. असे कधीही घडू नये. पण घडल्यास त्याचा दोष विमान कंपनीवर टाकणार की बेसुमार वस्ती उभारण्यास देणाऱ्या प्रशासनावर? "

भोपाळमध्ये कंपनीला दिलेल्या जागेच्या भोवती अजिबात वस्ती नव्हती हे सिद्ध करणारे १९७३ सालातील छायाचित्र मुद्दाम येथे प्रसिद्ध केले आहे. याच्याच वर सध्याचे भोपाळ दाखविले आहे. मृतांची संख्या का वाढली हे नव्या छायाचित्रावरून लगेच लक्षात येईल. कंपनी सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी भोवती वस्ती वाढू लागली. कंपनीच्या परिसरात राहणे धोकादायक आहे हे कंपनीने राज्य सरकारच्या अनेकवेळा लक्षात आणून दिले. कंपनीचे त्यावेळचे मॅनेजिंग डायरेक्टर व्ही पी गोखले यांनी न्यायालयात सादर केलेल्या निवेदनात ही बाब ठळकपणे निदर्शनास आणून दिलेली आहे. सरकारने या तक्रारींकडे डोळेझाक केली. वस्ती वाढत गेली व १९८४ सालापर्यंत वस्तीने कंपनीला चारी बाजूने वेढले.
भोपाळ दुर्घटनेपेक्षाही त्या घटनेला दिले गेलेले व आता दिले जाणारे प्रतिसाद चिंता वाढविणारे आहेत. माध्यमांमार्फत राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांतून भोपाळबाबत सुरू झालेले वाचिक रणकंदन पाहिले की आौद्योगिक, आधुनिक आणि प्रगल्भ समाजनीती  येथे रुजण्यास अद्याप बराच अवकाश असल्याचे दिसून येते.
काही हजार लोकांचे बळी घेणारी व हजारो लोकांच्या मागे आयुष्यभराचे दुखणे लावणारी दुर्घटना घडते, तेव्हा संपूर्ण समाज शोकसंतप्त होतो. तसा शोक आणि संताप १९८४ साली प्रकट झाला. या घटनेला जबाबदार कोण याचा तपास करून त्याला न्याययंत्रणेमार्फत योग्य शिक्षा ठोठावणे व पिडीतांना भरपूर मदत करून त्यांचे जीवन अधिकाधिक सुसह्य करण्यास हातभार लावणे, या प्राथमिक बाबी होत्या. परंतु, ही जबाबदारी पार पाडल्यानंतर ही दुर्घटना का व कशी घडली याची शास्त्रशुद्ध कारणे शोधून काढून पुन्हा अशी दुर्घटना घडणार नाही वा अपघाताने घडल्यास त्यावर योग्य उपाययोजना त्वरित करता येईल, अशी धोरणे सर्व स्तरांवर आखणे हे पिडीतांचे पुनर्वसन व दोषींना दंड करण्याहून अधिक महत्वाचे असते. दुर्दैवाने या दुसऱ्या टप्प्याकडे सरकारचे आणि पिडीतांच्या नावे गळा काढणाऱ्या माध्यमांचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
भोपाळमधील दुर्घटना १९८४ साली झाली. युनियन कार्बाईड इंडिया लिमिटेड ही कंपनी त्याला जबाबदार होती. या घटनेबद्दल त्या काळात बरेच लिखाण झाले असले तरी ते लिखाण वायूपीडितांना भोगावे लागणारे दुख आणि त्यांची झालेली वाताहात यापुरतेच मर्यादित होते. भोपाळ दुर्घटनेवरील खटल्याचा निकाल गेल्या महिन्यांत लागला. त्यानंतर पुन्हा या विषयावर लिहिले जात आहे व वृत्तवाहिन्यांवर भरपूर चर्चा होत आहे. यात बरेच मान्यवर भाग घेताना दिसतात. मात्र पंचवीस वर्षांपूर्वी ज्या पद्धतीची चर्चा झाली त्याच पद्धतीची चर्चा आजही होताना पाहून आश्चर्य वाटते. नवीन माहिती मिळवून या घटनेवर गांभीर्याने, शास्त्रशुद्ध आणि जबाबदारीने केलेली चर्चा क्वचितच कोठे दिसली. बहुराष्ट्रीय कंपन्यांना किंवा त्यावेळच्या सरकारला दोषी ठरविणारे स्टुडिओतील न्यायदान झटपट रीतीने उरकले गेले. भारतात अमेरिकाविरोधी गट कायम सक्रीय असतो. भोपाळ खटल्याची संधी साधून या गटाने मुक्त अर्थनीती, भारत-अमेरिका संबंध, अणुकरार अशा अनेक धोरणांबाबत जनतेमध्ये संशय निर्माण करण्याचे काम सुरू केले. अमेरिका वा तेथील बहुराष्ट्रीय कंपन्या हे अतिशय मतलबी आहेत यात शंकाच नाही. त्यांच्याबद्दल सदोदित सावध राहणे अतिशय आवश्यक असते. परंतु, हे करीत असताना आधी देशातील व्यवस्था मजबूत करावी लागते. जबाबदार सामाजिक व राजकीय व्यवहार पाळावा लागतो आणि भावनेला व्यावसायिक आचरणाची जोड द्यावी लागते. भोपाळ दुर्घटनेचे खलपुरूष कोण, हे ठरविण्याची घाई सर्वाना लागल्यामुळे लोकशिक्षणाच्या महत्वाच्या कामाकडे पूर्णत दुर्लक्ष झालेले आढळून येते.
भोपाळ दुर्घटनेचा जगातील विविध देशांनी तपशीलात जाऊन अभ्यास केला. ‘उद्योग सुरक्षा’ हे शास्त्रच आता विकसित झाले आहे. या शास्त्राच्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या अंगानी या घटनेचा पंचनामा केला. यातील बराच अभ्यास इंटरनेटवर उपलब्धही आहे. तो फारसा कोणी पाहिलेला नाही. हा अभ्यास पाहिला तर भोपाळ दुर्घटनेला युनियन कार्बाईडचे चेअरमन वॉरेन  अ‍ॅन्डरसन किंवा मॅनेजिंग डायरेक्टर व्ही पी गोखले एवढेच जबाबदार नसून केंद्र व राज्य सरकारसह एकूण व्यवस्था दोषी होती हे लक्षात येईल. व्यवस्था दोषी होती म्हणजे ती उलथून टाकावी असे नव्हे. या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता व सुधारणेचे मार्ग भोपाळ दुर्घटनेने दाखवून दिले. या मार्गांबाबत चर्चा झाली तर भविष्यात अशी दुर्घटना झाल्यास त्याच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यात आपल्याला यश येऊ शकेल.
भोपाळसारखी दुर्घटना होऊ नये म्हणून नवे कायदे वा नियम करण्याची काहीही गरज नाही. अस्तित्वात असलेले नियम कार्यक्षमतेने राबविणाऱ््या सरकारी नोकरांची मुख्यत गरज आहे. मात्र हे नियम बनविताना व्यावहारिक विचारही झाला पाहिजे. हे नियम मुख्यत नगररचनेशी संबंधीत आहेत. भोपाळमध्ये अपघात घडल्यानंतर उद्योगक्षेत्र त्याच्या मार्गाने काही बाबी शिकले. उद्योगक्षेत्राने नवे तंत्रज्ञान विकसीत करून मिथाईल आयसोसायनेटचा वापरच बंद करून टाकला. परंतु, अन्य अनेक विषारी रसायने वापरात आहेत. त्यांचा वापर टाळताही येत नाही. कारण आपण आपली जीवनशैलीच पूर्णत: रासायनिक केली आहे. महात्मा गांधींप्रमाणे ती बदलली तर भोपाळसारख्या घटना घडणारच नाहीत. कारण त्या जीवनशैलीत रासायनिक उद्योगांची गरजच आपल्याला लागणार नाही. पण आश्रमव्यवस्था स्वीकारायची नसेल आणि मॅकडोनल्ड संस्कृती हवीहवीशी वाटत असेल तर रासायनिक उद्योगांशिवाय गत्यंतर नाही. रासायनिक उद्योग हे धोकादायक आहेत. हा धोका पूर्णपणे कधीही टाळता येत नाही. मानवी वा यांत्रिक चूक ही गृहित धरावीच लागते. म्हणून अशा चुकांची शक्यता लक्षात घेऊन धोरणांची अंमलबजावणी करावी लागते. अशी अंमलबजावणी करताना भावनेच्या लाटेवर स्वार होऊन चालत नाही. तेथे शास्त्रीय विचार करावा लागतो.
पर्यावरणविषयक कडक नियम टाळण्यासाठी युनियन कार्बाईडने भारतात उद्योग सुरू केला असे समजले जाते. वस्तुस्थिती तशी नाही. ६० च्या दशकात ही कंपनी भारतात आली. पंजाबमधील हरितक्रांती त्यावेळी चर्चेचा विषय होती. शेतकरी आपले उत्पादन वाढविण्यास उत्सुक होते. त्यासाठी खते व किटकनाशके वापरण्यात येत होती. कंपनीला हे मार्केट दिसले. ही किटकनाशके बनविताना मिथाईल आयसोसायनेटसारखी घातक द्रव्ये वापरण्यात येणार आहेत याची पूर्वकल्पना केंद्र व राज्य सरकारला देण्यात आली होती. भोपाळमध्ये कंपनीला दिलेल्या जागेच्या भोवती अजिबात मानवी वस्ती नव्हती हे सिद्ध करणारे १९७३ सालातील छायाचित्र मुद्दाम येथे प्रसिद्ध केले आहे. याच्याच वरील बाजूला सध्याचे भोपाळ दाखविले आहे. मृतांची संख्या का वाढली हे नव्या छायाचित्रावरून लगेच लक्षात येईल. कंपनी सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी भोवती वस्ती वाढू लागली. कंपनीच्या परिसरात राहणे धोकादायक आहे हे कंपनीने राज्य सरकारच्या अनेकवेळा लक्षात आणून दिले. कंपनीचे त्यावेळचे मॅनेजिंग डायरेक्टर व्ही पी गोखले यांनी न्यायालयात सादर केलेल्या निवेदनात ही बाब ठळकपणे निदर्शनास आणून दिलेली आहे. सरकारने या तक्रारींकडे डोळेझाक केली. वस्ती वाढत गेली व १९८४ सालापर्यंत वस्तीने कंपनीला चारीबाजूने वेढले.
कंपनीभोवती राहण्यातून उद्भविणाऱ््या धोक्याची कल्पना कंपनीने लोकांना द्यायला हवी होती असे म्हटले जाते. नैतिकदृष्टय़ा हे योग्य आहे. परंतु, कंपनीपेक्षा नागरी व्यवस्थापनावर ही जबाबदारी अधिक पडते. कारवाई करून नागरिकांना सुरक्षित जागी हलविण्याची जबाबदारी पालिका व राज्य प्रशासनावर अधिक पडते. चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीचे अनेक अधिकारी कंपनीला वारंवार भेट देत होते. त्यांना धोक्याची कल्पना होती. पण नागरी वस्ती हलविण्याबद्दल कुणीही आग्रह धरला नाही.
दुसरा भाग अंतर्गत सुरक्षेचा आहे. कंपनीला तोटा येत असल्यामुळे यंत्रणा अद्यावत वा दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष होत होते असे म्हटले जाते. कारण ८४ सालापर्यंत किटकनाशकांचा खप कमी होत गेला तसेच भारतात दुष्काळही पडत होता. मंदीच्या  काळात कंपन्या दुरुस्तीच्या कामाला फाटा देतात असे सर्वत्र आढळून येते. कार्बाईड कंपनीनेही असे केले असेल. पण ते सिद्ध करणे कठीण आहे. कारण नोव्हेंबर १९८२ ते ऑगस्ट १९८४ याकाळात ६२४ दिवस व ३४,३०,००० मनुष्यतास सुरक्षित व विनाअपघात काम केल्याबद्दल मुख्यमंत्री अर्जुनसिंह, कामगार मंत्री श्याम सुंदर पाटीदार व नॅशनल सेफ्टी कौन्सिलने कंपनीचे लेखी अभिनंदन केले होते. कंपनीत सुरक्षित काम केले जाते याला अशी सरकारी मान्यता मिळाली असल्यावर कंपनीवर दोषारोप कसा करणार हा प्रश्न उपस्थित होतो.
धोकादायक रसायने वापरणाऱ्या कंपन्या कोठे व कशा उभारायच्या याबाबतची धोरणे सरकारने कठोरपणे अंमलात आणण्याची गरज आहे. शहरे वाढत जातात आणि शेवटी गावाबाहेर दूरवर बांधलेल्या रासायनिक उद्योगांपर्यंत पोहोचतात. यातून उद्भविणाऱ््या धोक्यांबाबत रासायनिक उद्योगांपेक्षा  स्थानिक प्रशासन व सरकारला जबाबदार धरले पाहिजे. मुंबई व मुंबईलगतच्या ठाणे शहरात असे सतत घडत आहे. मुंबईत शिवडी, वडाळ्यापासून चेंबूपर्यंत रसायनांच्या असंख्य टाक्या आहेत. त्याच्याभोवताली पूर्वी म्हणजे १५ वर्षांपूर्वीपर्यंत विरळ वस्ती होती. आता त्या भागात दाटीवाटी झाली आहे. ठाणे शहरातील अनेक रासायनिक कारखाने गावाबाहेर होते. त्यातील बरेच बंद पडले असले तरी काही कारखान्यांना लागून टॉवर उभे राहिले आहेत. घोडबंदर भागातील रहिवासी आता प्रदुषणाबाबत तक्रार करीत आहेत. तेथे प्रदुषण करणाऱ्या कंपन्या या कित्येक वर्षांपासून तेथे आहेत व मनुष्यवस्ती अलिकडील आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रदूषित कारखान्यांच्या परिसरात वस्ती होऊ द्यायची नाही या धोरणाची अंमलबजावणी कठोरपणे केली गेली आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ््या सरकारी नोकरांवर त्वरीत कारवाई केली गेली तरी मनुष्यहानीचे प्रमाण खूप कमी होईल.
मुंबई विमानतळ हे याबाबतचे आणखी एक उदाहरण. विमान अपघात हे बहुदा विमान उतरताना वा उड्डाणाच्यावेळी होतात. उंचावर विमान असताना क्वचितच अपघात होतो. मुंबई विमानतळावर उतरण्याचा विमानाचा मार्ग हा अत्यंत दाट लोकवस्तीवरून जातो. मंगलोर येथे घडली तशी दुर्घटना मुंबई विमानतळावर झाली असती तर मृतांचा आकडा कित्येक हजारांत गेला असता. वस्तीवर विमाने पडण्याचे काही अपघात अमेरिकेत झाले आहेत, पण तेथील वस्ती विरळ असल्यामुळे जमीनीवरील मृतांची संख्या कमी होती. मुंबईत तसे होणार नाही. विमानातील प्रवाशांपेक्षा कित्येक पट जास्त माणसे जमीनीवर मृत्युमुखी पडतील. असे कधीही घडू नये. पण घडल्यास त्याचा दोष विमान कंपनीवर टाकणार की बेसुमार वस्ती उभारण्यास देणाऱ्या प्रशासनावर? रासायनिक उद्योग कोठे असावा याबरोबरच दुर्घटना घडल्यास ती आटोक्यात आणणारी आणि पिडीतांना त्वरीत योग्य मदत करणारी यंत्रणा कायम उभी असणे हेही महत्वाचे असते. अद्यावत उपकरणानी युक्त असे अग्नीशमन दल असावे लागते. या दलाच्या कर्मचाऱ््यांना अनेक रसायनांची व्यवस्थित माहिती द्यावी लागते. याबाबतचा तज्ज्ञ दलाकडे असावा लागतो. त्याला सतत प्रशिक्षित ठेवावे लागते. याचबरोबर उत्तम इस्पितळे परिसरात असावी लागतात. तेथील डॉक्टरांना प्रशिक्षण द्यावे लागते. भोपाळमधील आरोग्य सेवा पुरेशी नव्हती. तेथे फक्त चार इस्पितळे होती. आणीबाणीच्या परिस्थितीत कसे काम करायचे हे डॉक्टरांना माहित नव्हते. पिडीतांवर त्वरीत उपचार केले गेले नाहीत अशी तक्रार केली जाते. पण मिथाईल आयसोसायनेटची बाधा झाल्यास त्यावर तेव्हा उपाय नव्हते व आताही नाहीत. केवळ पूरक उपचार करता येतात. मुंबई व ठाणे परिसरात अजूनही पुरेशी इस्पितळे नाहीत. तेथील डॉक्टरांना प्रशिक्षण मिळालेले नाही. नागरिकांना याबाबत अद्यापही प्रशासनाने जागरूक केलेले नाही. भोपाळमधील दुर्घटनेनंतर हे सर्व घडून येणे आवश्यक होते. पण तसे घडले नाही व कोण दोषी याचा शब्दच्छल करण्यात आपण वेळ दवडीत आहोत.
अपघात घडला तर त्याबाबत विश्वासार्ह माहिती जमा करणे आपल्याला जमत नाही. विश्वासार्ह ठोस पुरावा आपण सादर करू शकत नाही. हे वेळोवेळी घडलेले आहे. भोपाळबाबत आपण विश्वासार्ह आकडेवारी पुरविली नाही. वायूपीडितांच्या निश्चित आकडय़ाबाबत मतभेद असल्याचे तेथे काम करणारे डॉक्टर्स सांगतात. विषारी वायू पाच किलोमीटर परिसरात पसरला. साधारणपणे तीन हजार माणसे मृत झाली व वायूचा संसर्ग झालेल्यांची संख्या २० ते ८० हजार असावी. यामध्ये तीव्र संसर्गापासून मामुली संसर्गापर्यंत सर्वाचा समावेश आहे. मात्र आपण पीडितांची संख्या काही लाखांवर नेऊन ठेवली. जगाच्या कोणत्याही न्यायालयात या संख्येवर विश्वास ठेवला गेला नसता. ठोस पुराव्यानिशी निश्चित आकडेवारी अमेरिकेतील न्यायालयात सादर केली गेली असती तर एक अब्ज डॉलर्सइतकी नुकसानभरपाई मिळणे कठीण नव्हते. कदाचित अधिकही मिळाली असती. लोकप्रिय होण्याच्या नादात पीडितांची संख्या नेत्यांनी वाढवित नेली व सरकारी अनुदान लाटले. याचा परिणाम खटल्यावर झाला. आजही कोणत्याही दुर्घटनेनंतर परस्परविरोधी वैद्यकीय अहवाल आपल्याकडे सादर होतात. मृत्यूचे निश्चित कारण काय हे समजू शकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी संदिग्धता चालू शकत नाही. दुर्घटनेबाबतचे अहवाल विश्वासार्ह कसे बनतील याकडे सरकारने अद्यापही लक्ष दिलेले नाही. त्याचबरोबर प्रत्येक बाबतीत, अभ्यास न करता, संशय निर्माण करून माध्यमेही विश्वासार्हता कमी करीत असतात.रतन टाटा यांच्याबाबतचे उदाहरण याबाबत पाहता येईल. कार्बाईड कंपनीतील धोकादायक कचरा व अन्य अवशेष नष्ट करण्यासाठी भारत सरकार व खासगी उद्योगांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावे असे रतन टाटा यांनी सुचविले होते. या पत्रात त्यांनी डाऊ केमिकलसाठी सरकारने घातलेल्या शंभर कोटी रुपयांच्या अटीचाही उल्लेख केला होता. या उल्लेखामुळे टाटांच्या या प्रयत्नांबद्दल विनाकारण संशयाचे धुके पसरविण्यात आले आणि एक व्यावहारिक उपाय बासनात बांधला गेला. असे आपल्याकडे अनेकदा होते. प्रत्येक बाबतीत संशय निर्माण करून कामात खोडा घालण्याची सवय आपल्या अंगात मुरली आहे.
भोपाळ दुर्घटनेपासून आणखी काही मूलभूत धोरणात्मक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते मुक्त अर्थव्यवस्थेशी संबंधीत आहेत. भारताची अर्थव्यवस्था जगाशी जोडली जात आहे. अनेक कंपन्या येथे येऊ लागल्या आहेत. त्या अनेक प्रकारच्या सवलती मागत असतात. गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांना मोकळे रान दिले जाते. या कंपन्यांवर कडक र्निबध घातले तर गुंतवणूक होणार नाही अशी भीती घातली जाते. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून असा दबाव येतो हे खरे आहे. त्यांना बेसुमार फायदा हवा असतो व अन्य देशातील सोडा, स्वदेशातील नागरिकांच्या जीवाचीही त्यांना पर्वा नसते. एरीन ब्रोकोवीच किंवा रोश कंपनीविरुद्ध अ‍ॅडम्सने पुकारलेला लढा यातून हे दिसून आले आहे. अमेरिकेतील औषध कंपन्या कशी लूट करतात यावर पुस्तके लिहिली गेली आहेत. आताही न्यूक्लिअर लायबिलीटी बीलामुळे हा प्रश्न पुढे आला आहे. अणुभट्टीत अपघात झाल्यास त्याबद्दल किती भरपाई द्यावी व ती कुणी द्यावी याबद्दलचे हे विधेयक आहे व त्याचा सध्याचा मसुदा हा आपल्यावर अन्याय करणारा आहे.
मात्र नुकसान होऊ न देता यातून मार्ग काढण्यात राजकीय नेत्यांची कसोटी आहे. भारताला गुंतवणूक हवी आहे कारण बेकारीची समस्या दिवसेंदिवस उग्र होत जात आहे. तथापि, गुंतवणूक ही जशी भारताची गरज आहे तशीच ती प्रगत राष्ट्रांचीही आहे. कारण त्यांना बाजारपेठ हवी आहे. किंबहुना भारतातील श्रीमंतांची संख्या वाढण्यात अमेरिकेचे हित आहे. म्हणजे बाजारपेठेचे गाजर दाखवून आपण आपला फायदा करून घेऊ शकतो. मात्र एवढय़ावर भागणार नाही. प्रगत राष्ट्रांबरोबर बरोबरीच्या नात्याने व्यवहार करायचा असेल तर तंत्रज्ञानाची समृद्धी कमवावी लागेल. इथे आपण फारच कमी पडतो. नवे तंत्रज्ञान शोधून नवी बाजारपेठ आपण तयार करू शकलेलो नाही. भारत श्रीमंत होत आहे, पण हा पैसा नवे तंत्रज्ञान शोधण्याकडे लागत नाही. भारतातील श्रीमंती ही नोकरदारांची श्रीमंती आहे आणि नोकरदारांच्या बडबडीला जगात कधीच फारशी किंमत नसते. केवळ रासायनिकच नव्हे तर सर्वच महत्वाच्या क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान शोधण्याकडे भारताने लक्ष दिले पाहिजे. जी पाश्चात्य जीवनशैली आपण स्वीकारत आहोत त्या शैलीला पूरक असे तंत्रज्ञान जोपर्यंत इथे निर्माण होत नाही तोपर्यंत आपण प्रगत राष्ट्रांकडून होणाऱ््या गुंतवणुकीवरच अवलंबून राहू. पंडित नेहरूंना याची जाण असल्यामुळेच त्यांनी प्रगत राष्ट्रांच्या मदतीने आयआयटी सुरू केली. टाटांनी टीआयएफआरसाठी पैसा दिला. मूलभूत व उपयुक्त संशोधन व्हावे हा दृष्टीकोन त्यामागे होता. दुर्दैवाने तसे न होता आयआयटीने फक्त परदेशात नोकरी मिळवणाऱ्या भारतीय अभियंत्यांची संख्या वाढविली. अर्थात तसे होण्यास येथील राजकीय व सामाजिक वातावरण कारणीभूत होते. देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण याबद्दल सरकारमध्ये एकवाक्यता असावी अशी सर्वत्र अपेक्षा असते. सध्याच्या युपीए सरकारमध्ये तसे घडताना दिसत नाही. मनमोहनसिंग, प्रणब मुखर्जी, चिदम्बरम व त्यांचे सहकारी यांचा आधुनिक आणि व्यवहारिक दृष्टीकोन आहे, तर भांडवलदारांबद्दल सर्वत्र व सर्वकाळ संशय घेणाऱ्यांचा गट कॉंग्रेसमध्ये अद्यापही सक्रीय आहे, म्हणून एखाद्या बडय़ा कंपनीबाबत प्रत्येक मंत्रालयाचा निर्णय वेगवेगळा, म्हणजे आपल्या दृष्टीकोनानुसार दिला गेलेला दिसेल. परदेशात भारताचे वजन पडत नाही, याला दहा तोंडानी बोलणारे सरकार हे एक महत्वाचे कारण आहे. चीनबाबत असे होत नाही. चीनमध्ये एकच तोंड बोलते. साहजिक गुंतवणूकदार भारतापेक्षा चीनला प्राधान्य देतात व भारतातील भ्रष्टाचाराचा वारंवार उल्लेख करतात. भोपाळबाबत नव्याने नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत या सर्व समस्यांची व मुख्यत: वर्क कल्चरमध्ये बदल करण्यासाठी काय करता येईल, यावर विचार व्हायला हवा होता. पण भारतीय मानसिकतेला शोभणारा व्यवहार तेथे झाला. भोपाळमध्ये स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी मंजूर झाले, पीडितांची भरपाई वाढविण्यात आली . यातील पीडितांची भरपाई वाढविणे इतकाच भाग व्यवहाराला धरून आहे. ही भरपाई पूर्वीही वाढविता आली असती. त्यासाठी न्यायालयाच्या निकालाची काहीही गरज नव्हती. मुळात अशा दुर्घटना घडल्यास त्याचा परिणाम कमी करण्यासाठी व त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी काय करता येईल यावर निर्णय झाला असता तर देशाचा फायदा झाला असता. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण परदेशातील नुकसानभरपाईचे दाखले देतो. ओबामा यांनी ब्रिटीश पेट्रोलियमला २० अब्ज डॉलर्स देण्यास कसे भाग पाडले हे सांगतो व मनमोहनसिंग यांच्याकडून तशा कणखर धोरणाची अपेक्षा करतो. पण वैज्ञानिक व उद्योगांनी उभे केलेले तांत्रिक बळ तसेच बऱ्यापैकी सचोटीने चालणारा सामाजिक व राजकीय व्यवहार यामुळे ओबामा यांना हे बळ मिळते हे आपल्या लक्षात येत नाही. त्याचबरोबर कोणती जीवनशैली, किती प्रमाणात आपण स्वीकारायची याचाही विवेक आपण बाळगत नाही. याचा एकत्रित दुष्परिणाम कसा होतो हे आपण भोपाळमध्ये अनुभविले. पण त्यापासून आपण काहीच शिकलो नाही. औद्योगिक, आधुनिक व प्रगल्भ समाजनीती रुजवणे हा भोपाळसारख्या दुर्घटनेवर खरा तोडगा आहे.

धन्यवाद लोकसत्ता ... ....    Link to original article

Sunday, March 21, 2010

वाईट कामांना नेहमी चांगल्या कामांनी झाकलं पाहिजे

राज्याची प्रजा राजाच्या कारभारावर नाराज होती. तिच्या मनात खूप तक्रारी होत्या. त्यामुळे एक दिवस राजाच्या विरुद्ध मोर्चा काढण्यासाठी प्रजा रस्त्यावर उतरली. ही गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली.
त्याने फर्मान सोडले की, जशी गरज असेल तसे पाऊल उचला, पण कसेही करून हा मोर्चा, हा उद्धटपणा थांबवा.
मोर्चा निघाला पण लवकरच तो गोळीबार, लाठीमार करून अडवला गेला. ज्याने बरेच लोक घायाळ झाले. इकडे तिकडे पांगले गेले. मोर्चाच्या नेत्यांना अटक केली गेली. शहरात दहशत पसरली.
काही काळानंतर प्रधानाच्या हुकूमानुसार शहरात बरीच चांगली कामे होऊ लागली, धान्य स्वस्त झालं, नवीन कारखाने उघडले गेले, रस्ते बनवले गेले. हे सगळं बघून एका सभ्य माणसाने प्रधानाला विचारलं, ‘‘तुम्ही तर कमाल करत आहात, काल तुम्ही ह्य़ा शहरातील लोकांवर गोळ्या झाडून त्यांना मारून टाकत होता आणि आज त्याच शहरातील लोकांच्या सुखासाठी, प्रगतीसाठी प्रयत्न करत आहात?
हुशार प्रधानाने उत्तर दिलं, मी मांजरीकडून एक धडा शिकलोय, तिने जर एखाद्या चांगल्या जागेवर घाण केली तर त्यावर ती लगेचच माती पसरून देते.
वाईट कामांना नेहमी चांगल्या कामांनी झाकलं पाहिजे. कारण निवडणुका येईपर्यंत लोक आम्ही केलेले वाईट काम विसरून जातील आणि आमची चांगली कामंच लक्षात ठेवतील.

Sunday, March 7, 2010

अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!

अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधी बाकावरील काही मंडळी निषेध म्हणून उठून गेली. त्यामुळं बादशहा  अस्वस्थ झाला. अर्थमंत्री एवढा विचार करून, मेहनत करून अर्थसंकल्प तयार करतात, त्यावर विचार करून त्यातील त्रुटी दाखवून द्याव्यात, काही सूचना कराव्यात हे सर्व सोडून विरोधी गटानं अर्थसंकल्प न ऐकताच पळ काढावा हे बादशहाला रुचलं नाही आणि पटलंही नाही. या सर्व प्रकारामुळं अर्थमंत्रीही नाराज झालेले दिसत होते. बादशहानं त्यांना आपल्या नजरेनंच दिलासा दिला आणि अर्थसंकल्पाचं वाचन पुढे सुरू ठेवण्यास सांगितलं.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी तो उत्तम आहे असं सांगितलं तर विरोधकांनी त्यातील दरवाढीचा निषेध केला. काही गट जे बादशहासोबत सत्तेत भागीदार होते त्यांच्या प्रदेशात निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यांनीही भाववाढीला विरोध केला.
त्याच रात्री बादशहानं बिरबलाला विचारमंथनासाठी बोलावलं. बादशहाची नाराजी बिरबलाच्या नजरेनं टिपली होती; त्यामुळं त्याला अंदाज आला होता. बिरबल आल्यावर थोडावेळ राज्याच्या दैनंदिन कामांची चर्चा झाली आणि मग बादशहानं आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. ती ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘हा त्या विरोधकांचा दोष नव्हे, आपल्या संसदीय संकल्पनांचा दोष होय.’ बादशहाला त्याचा अर्थ कळला नाही तेव्हा बिरबल अधिक स्पष्ट करत म्हणाला, ‘खाविंद आपण लोकप्रतिनिधींची विभागणी ‘सत्ताधारी आणि विरोधक’ अशी करतो. एकदा विरोधक म्हटलं की त्यानं प्रत्येक गोष्टीला विरोध करणं ओघानं आलंच. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच विरोधकांची त्यावरील प्रतिक्रिया ठरलेली असते, मग तो त्यांनी ऐकला काय आणि न ऐकला काय याने काय फरक पडतो?’ बादशहा ऐकून विचारात पडला त्याची ही मन:स्थिती हेरून बिरबल पुढे म्हणाला, ‘सत्ताधारी आणि सत्तेवर नसलेले’ अशी खरं तर विभागणी व्हायला पाहिजे. ‘यावर उपाय काय?’ बादशहानं कळीचा प्रश्न विचारला. बिरबल म्हणाला, ‘आहे ना. पुढच्या वर्षी अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!
बिरबलाची सूचना मान्य करत बादशहानं त्याला रात्रीच्या भोजनासाठी आग्रहानं थांबवून ठेवलं. ‘मी रात्री जेवायला घरी नसेन’ हे बिरबलानं घरी आधीच सांगून ठेवलं होतं.

Sunday, February 21, 2010

ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो

मंत्रिमंडळाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेणारी बैठक सुरू होती. प्रत्येक मंत्री आपापला अहवाल सादर करत होता. मंत्र्यांच्या समोर द्राक्ष्याचे तजेलदार घोस चांदीच्या तबकांमध्ये ठेवलेले होते. एकूण मंत्र्यांच्या कामगिरीवर बादशहा समाधानी होता. बिरबल शांतपणे प्रत्येक मंत्र्याचा अहवाल ऐकून टिपणं काढत होता. बैठक सुरू असतानाच अचानक बाहेर गोंगाट, घोषणाबाजी, दगडफेक अशी गडबड सुरू झाली. सुरक्षा यंत्रणा लगबगीनं कामाला लागली. बादशहाने सेवकाला बाहेर काय गडबड चालली आहे ते पाहून येण्यास सांगितले. सेवक गेला आणि परत येऊन म्हणाला, ‘खाविंद, बाहेर मोठ्ठा मोर्चा आहे, ऑस्ट्रेलियन, पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या देशात खेळायला येऊ नये, त्यांना अटकाव करावा.. अशी मागणी करीत आहेत ते!’ तोवर गृहमंत्र्यांनी जाऊन बंदोबस्ताची पाहणी करून काही आदेशही दिले होते. त्यामुळे बैठक शांततेत पार पडली.
बैठक संपल्यावर बादशहा आणि बिरबल शाही भोजनासाठी एकत्र गेले. मटारच्या करंज्या, हरभरा भात असा संपूर्ण शाकाहारी बेत होता. तोंडात तुकडा ठेवताच स्वादिष्ट सुखाची भावना भरून यावी अशा त्या करंज्यांचा आस्वाद घेता घेता बादशहा म्हणाला, ‘मला एक कळत नाही, अमूक देशांच्या खेळाडूंना इथं पाय ठेवायला देऊ नका, तमूक देशाशी खेळू नका अशी अतिरेकी भूमिका ही माणसं का घेतात? अरे हा काय पोरखेळ आहे का? राजकारण वेगळं असतं आणि खेळ, कला या गोष्टी वेगळ्या असतात!’
हरभरा भाताचा घास घेत, ताकाची वाटी हाती धरत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ही माणसं अशी अतिरेकी भूमिका घेतात हे तुमचं केवढं नशीब म्हणायचं?’ हे ऐकून बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘आता ह्यात तुला माझं नशीब कुठं दिसलं?’
जिरे-हिंगाची मस्त फोडणी घातलेल्या ताकाचा घोट घेत बिरबल म्हणाला, ‘खाविंद,  ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो. अशी माणसं सत्तेत येऊ नयेत याची काळजी लोकच घेत असतात. आणि खरं सांगायचं तर अशा मानसिकतेच्या व्यक्तींना सत्तेची जबाबदारी नकोच असते. त्यांना दहशतीचं एक समांतर साम्राज्य फक्त उभं करायचं असतं.. आणि अशी दहशत टिकविण्यासाठी ते देशभक्तीच्या भडक व्याख्या करीत अतिरेकी भूमिका घेत राहतात..!’
बादशहा खाता खाता थांबून विस्मयानं सगळं ऐकत होता. बिरबलाचं तर्कशुद्ध विश्लेषण ऐकून त्याचा चेहरा खुलून आला व तो बिरबलाला म्हणाला, ‘म्हणजे फार काळजी करण्याची गरज नाही!’ करंजीचा शेवटचा घास घेत बिरबल म्हणाला, ‘काळजी करण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजेच!’ ‘सुभानअल्लाह क्या बात कही बिरबल’ असं म्हणत बादशहानं आपल्या हातानं आणखी दोन करंज्या बिरबलाच्या ताटात घातल्या!

Monday, February 1, 2010

काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते

दिवाळीच्या सुमारास बादशाह आणि बिरबल रात्रीच्या वेळी राजधानीचा एक फेरफटका मारण्यास निघाले. सगळीकडे प्रकाशाचं साम्राज्य पसरलेलं होतं. रंगीबेरंगी दिव्यांनी आकाश व्यापलं होतं. दारादारात तेला-तूपाचे दिवे लागलेले होते. महागडय़ा वस्त्रांची दुकानं गर्दीनं तुडुंब भरलेली होती. जिथं-तिथं ‘डिस्काऊंट सेल’ लागलेले होते आणि तिथं अधिकच गर्दी होती. सुगंधी फवारे, सुगंधी तेले, उटणे यामुळं आसमंत सुगंधाच्या विविधतेत न्हाला होता. फराळाच्या पदार्थाची दुकानं पिशव्या भरभरून पदार्थ विकत होती. शिवाय घराघरात तळणी-भाजणी सुरू होतीच. मूलं-माणसं फटाक्यांचा, शोभेच्या दारूचा आनंद लुटत होती. हे सर्व पाहता पाहता बादशाह अचानक थबकला आणि बिरबलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘एकूण मला तुम्ही जे काही रिपोर्ट्स देता ते सगळे खोटे आणि फसवे असतात तर!’’ बिरबल म्हणाला, ‘‘ तुम्हाला काय म्हणायचे आहे खाविंद?’’ बादशहा घुश्शातच म्हणाला, ‘‘महागाई, मंदी, नोकरकपात, दुष्काळ, नापिकी, भ्रष्टाचार यामुळं जनता त्रस्त आहे असं तू मला नेहमी सांगत असतोस.. आणि प्रत्यक्षात तर जनता आनंदी दिसते आहे. केवढा उत्साह आहे दिवाळीचा? कुठं आहे तुझी ती महागाई? कुठं आहे मंदी?’’ बिरबल काहीच बोलला नाही, कारण बादशहाचा पारा खूपच चढलेला होता. बादशहाला जरा वेळानं बिरबलानं निरोपाचा कुर्निसात केला तेव्हाही तो रागातच होता. आठवडाभरानं बिरबल पुन्हा बादशहाच्यासमोर बसलेला होता. बादशहाच्या सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता त्याविषयी विचार करण्यासाठी ही बैठक होती. बैठक सुरू झाली आणि मोठय़ा बेगमची दासी धावत आली. म्हणाली, ‘‘बेगमच्या अब्बाजानची तब्येत खूपच खालावली आहे.’’ ते ऐकून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, अशा स्थितीत आपण सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन करू नये!’’ त्यावर बादशहा म्हणाला, ‘‘बिरबल, काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते.’’ हे ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘‘लोक दिवाळी साजरी करताना, असाच विचार करतात खाविंद!’’ बादशहा चमकचा आणि दासीकडे पाहून म्हणाला, ‘‘अगं मोठय़ा बेगमच्या अब्बाजानच्या इंतकाल (निधन) तर गेल्यावर्षीच झाला ना?’’ आणि मग बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘आम्हाला धडा शिकवलात ना, चला आता वर्धापनदिनाची तयारी करू या!

Wednesday, January 20, 2010

लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!

नागरिकांनी मतदानासाठी मोठय़ा प्रमाणात बाहेर पडावे, मतदानाच्या दिवशी पिकनिकला वगैरे जाऊ नये, भयमुक्त मतदान करावे म्हणून स्वत: बादशहा आवाहन करत होता. बिरबलानेही ठिकठिकाणी सभा घेऊन नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. परंतु एका बुद्धिवाद्याने या उलट प्रचार सुरू केला. ‘सगळे उमेदवार भ्रष्ट आहेत, खोटारडे आहेत, मतलबी आहेत, तेव्हा मतदान करू नका.’ सामान्य माणूस अनेकदा आवश्यक असेल तेव्हा चिरीमिरी देऊन स्वत:ची कामे करून घेतो, परंतु नेत्यांच्या भ्रष्ट आचाराविषयी जागरूक असतो. त्यामुळं, मतदानाला विरोध करणाऱ्या बुद्धिवाद्याच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला. ते पाहून बादशहा काळजीत पडला. बिरबलही विचारात पडला. मग बिरबलानं त्याची चौकशी यंत्रणा कामाला लावली. चौकशी पूर्ण झाल्यावर बिरबलानं बुद्धिवादी नेत्याला भोजनाचं निमंत्रण दिलं. गप्पा-टप्पा, चर्चा असं बरंच काही झाल्यावर रात्री उशीरा सगळ्यांना सपाटून भूक लागली. मग जेवण वाढलं जाऊ लागलं. बुद्धिवाद्याकडे पाहून बिरबल म्हणाला, ‘माफी असावी. आपण नॉनव्हेज खात नाही आणि व्हेजमध्ये सुध्दा तुमची नावडती वांग्याची, भेंडीची भाजी आहे. तेव्हा आपण आज जेवला नाहीत तरी चालेल!’ बुद्धिवादी म्हणाला, ‘अहो, आता एव्हढय़ा रात्री निवड करायला कुठं वेळ आहे, पोट भरलं नाही तर शरीराची यंत्रणा कशी चालेल?’ बिरबल हसत हसत म्हणाला, ‘माझंही तेच म्हणणं आहे. लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!’ बुद्धिवादी खजिल झाला आणि त्यानं मसाल्याची वांगी ताटात वाढून घेतली. अर्थातच मतदानविरोधी चळवळ त्यानं बंद केली. बिरबलाची ‘डिनर डिप्लोमसी’ बादशहाला बेफाम आवडली आणि त्यानं बिरबलाला ‘रेशमी कबाब’चा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केलं!

Tuesday, January 19, 2010

इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?

बादशहानं आपल्या मुलाचं इतिहासाचं पाठय़पुस्तक सहज म्हणून चाळलं आणि ते वाचता वाचता तो भयंकर संतापला. पाठय़पुस्तकात बादशहाच्या कर्तृत्ववान खापर पणजोबांवर एक धडा होता. त्या धडय़ात बादशहाच्या खापर पणजोबांविषयी दिलेली काही माहिती बादशहाला रुचली नाही. बादशहानं संतापून ते पुस्तक भिरकावून दिलं आणि बिरबलाला बोलावणं धाडलं. बादशहाला एवढं संतापलेलं बिरबलानं कधीच पाहिलेलं नव्हतं. ‘खाविंद, एवढं संतापायला काय झालंय आज?’ असं त्यानं विचारताच बादशहानं इतिहासाच्या पुस्तकातील धडय़ाविषयी त्याला सांगितलं. बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांची आणि सत्ताधिशांची मर्जी सांभाळणारे, लाळघोटे इतिहासकार आपल्या राज्यात नाहीत, याचा तुम्हाला खरं तर अभिमान वाटायला हवा!’ बादशहा म्हणाला, ‘परंतु हे सगळं खोटं आहे! बिरबल म्हणाला, ‘ठीक आहे, मग काय करावं, अशी तुमची इच्छा आहे?’ बादशहा म्हणाला, ‘हे सर्व बदलून टाका, माझ्या खापरपणजोबांविषयी काय लिहायचं ते मीच सांगेन! बादशहाच्या आदेशानुसार नवा इतिहास लिहिण्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यानंतर चार दिवसांनी बादशहा आणि बिरबल सकाळी फिरायला गेले असताना बादशहाला ठेच लागली आणि त्याचं पायाचं बोट रक्ताळलं. राजवाडय़ावर परत आल्यावर बादशहाचा धाकटा मुलगा त्याच्या पायाकडे पाहत म्हणाला, ‘अब्बाजान, काय झालं?’ बादशहाला बोलण्याची संधी न देता बिरबल म्हणाला, ‘‘रस्त्यात एक साप आडवा आला, खाविंदांनी त्याला लाथेनं उडवलं. त्यामुळे बोटाला जखम झाली. मुलानं बापाकडे अभिमानानं पाहिलं आणि तो बापाचा पराक्रम आईला सांगण्यासाठी घरात पळाला. बादशहा विस्मयानं बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘अरे त्याला खोटं का सांगितलंस! खरं सांगितलं असतं तर त्या रस्त्यानं दगड आहेत, सांभाळून चाललं पाहिजे हे तरी त्याला कळलं असतं!’
बिरबल म्हणाला, ‘खाविंद, पुढं भविष्यात तुमचा एखादा खापर पणतू खोटा इतिहास लिहिल, त्यापेक्षा आपण आताच त्याची व्यवस्था केलेली बरी!’
अर्थात बादशहा हे ऐकून वरमला. त्याची ती स्थिती पाहून बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांमध्ये आणि समाजाच्या नेतृत्वामध्येच जर इतिहास पचवण्याची ताकद नसेल तर समाजात ती कुठून येणार? आणि इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?’ बादशहा हे ऐकून खिन्न झाला, कारण त्याची विवेकबुद्धी शाबूत होती.

Tuesday, January 12, 2010

समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे

बादशहाच्या दरबारातील एका कलावंतानं राज्याबाहेर जाऊन आपल्या नाटय़कृतीचे प्रयोग केले आणि त्या नाटय़कृतीचं सगळीकडे प्रचंड कौतुक झालं. त्या नाटकाला अनेक राज्यांमध्ये सन्मानित केलं गेलं. तो कलावंत आपला संच घेऊन राज्यात परतला तेव्हा राज्यातही त्याचं मोठं स्वागत करण्यात आलं. बादशहानं त्या नाटय़कृतीच्या लेखकाचा, दिग्दर्शकाचा आणि कलावंतांचा दरबारी सन्मान करायचं ठरवलं. ह्य़ा सत्कार सोहळ्याला मंत्री, त्यांचे कुटुंबीय आणि सामान्य नागरिकांनीही खच्चून गर्दी केली. बादशहा आपल्या दोन्ही बेगमसह उपस्थित होता. आधी त्या नाटकाचा रंगतदार प्रयोग झाला. टाळ्यांच्या कडकडाटात दिग्दर्शक मंचावर उपस्थित झाला. खुद्द बादशहानं त्याच्या सर्जनशीलतेला लवून कुर्निसात केला. शाही सन्मान प्रदान करण्याची घटीका आली आणि एक दरबारी पंडीत रागाने थरथरत उभा राहिला व म्हणाला, ‘खाविंद, आपल्या राज्यातील गरीबी आणि गरिबांची वस्ती या नाटकात दाखविली आहे. या नाटकाचा सन्मान करून इतर राज्यांनी आपल्याला खिजवलं आहे, हिणवलं आहे. तेव्हा आपणही याचा सन्मान करणं हा मूर्खपणा आहे असं मला वाटतं.’ त्या पंडिताच्या हुषारीचा दराराच असा होता की, उपस्थित अंतर्मूख झाले. अनेकांच्या चेहऱ्यावर चलबिचल दिसू लागली. बादशहाच्या नजरेचा इशारा ओळखून बिरबल उठून उभा राहिला व त्या पंडिताला म्हणाला, ‘आपण आम्हाला आदरणीय आहात. मी एक प्रश्न विचारू का?’ पंडितानं होकार दिल्यावर बिरबल म्हणाला, ‘ही गरीब वस्ती म्हणजे काय आहे असं वाटतं आपल्याला?’ पंडीत विजयी मुद्रेनं म्हणाला, ‘राज्याच्या सुदृढ शरीराला आलेली किळसवाणी गाठ आहे ती!’ बिरबल हसत उत्तरला, ‘मग गाठ लपवून ठेवणं राज्याच्या हिताचं आहे की ती जगाला दाखवून तिच्यावर इलाज करणं हिताचं आहे?’ प्रश्न ऐकून पंडिताचा चेहरा उतरला. ती संधी घेत बिरबल म्हणाला, मला वाटतं, समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे. ते या नाटय़कृतीनं केलं आहे. आता त्यावर उपाय शोधण्याचं पुढलं काम आपण करायचं आहे.’ टाळ्यांचा कडकडाट झाला आणि बादशहानं बिरबलाकडे कृतज्ञतेचा कटाक्ष टाकत कार्यक्रम पुढं सुरू केला.

Sunday, January 3, 2010

तो तरुण खरं तर तुमच्या हिताचं सांगत होता, परंतु तुमची मन:स्थिती ठीक नसल्यानं तुमचा तोल गेला खाविंद!

लोकसत्ता पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी --- यशवंत गावडे

बादशाह आणि बिरबल शेजारच्या राज्यातली वृत्तपत्रं उत्सुकतेनं चाळत बसले होते. त्या देशातल्या एका सभ्य व्यक्तीनं ‘विरोधी पक्ष अस्थीर असणं बरं नव्हे’ असं म्हटलं तर त्याला ‘तुम्ही तुमचं बघा, आमचं आम्ही बघून घेऊ असं’ उत्तर विरोधकांनी दिलं. ते वाचनू बादशहा म्हणाला,‘अरे ही माणसं चांगल्या मनानं सांगितलंले सुद्धा ऐकून का घेत नाहीत? ’ आपल्या हिताची गोष्टही ऐकून घ्यावीशी वाटत नाही’ बादशहाला काही ते पटलं नाही. दोघांमध्ये बराच वेळ ह्यावर वाद सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बादशहा आणि बिरबल घोडय़ांवरून रपेट मारायला जाणार होते. परंतु बादशहाचा आवडता घोडा आजारी आहे असं पार्टीच्या प्रमुखानं सांगितलं. बादशहाचा मूड गेला. तो बिरबलाला म्हणाला, ‘आज माझा अंगरखाही नीट बसलेला नाही आणि घोडा आजारी आहे. आपण पयीच फिरायला जाऊया.’ दोघे फिरायला निघाले. बिरबल बादशहाला म्हणाला,‘पायीच जायचं आहे तर मग नेहमीपेक्षा वेगळ्या रस्त्यानं जाऊया!’ दोघेही निघाले. थोडं चालून गेल्यावर बादश्हा म्हणाला,‘हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी ह्यावर्षी आपण निधी मंजूर केला होता ना?’ बिरबल म्हणाला,‘होय खाविंद, रस्ता बहुतेक नीट दुरूस्त केला नसणार. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा उखडला.’ थोडं पुढे एका इमारतीचं काम अध्र्यावरच बंद पडून शेवाळ धरलं होतं. ‘हे असं बंद का पडलंय?’ बादशहानं विचारलं. ‘माफी असावी खाविंद. आपले अधिकारी पैसे खाऊन बांधकामांना परवानगी देतात आणि मग त्याच व्यवहारात कमी जास्त झालं की काम बंद पाडतात.’ बिरबल म्हणाला. हे ऐकून बादशहाचा मूड अधिकच खराब झाला. भरीस भर म्हणून चालता चालता बादशहाच्या चपलेचा अंगठा तुटला. कसा तरी लंगडत, अडखळत बादशहा परतीच्या वाटेला निघाला. त्याला असं चालताना पाहून एक तरूण थांबला. त्यानं आपली पादत्राणं काढली आणि बादशहाला म्हणाला,‘हुजूर, आपण माझी पादत्राणं घालून जा. आपली चप्पल दुरूस्त करून मी राजवाडय़ावर आणून देतो.’ त्याचं ते बोलणं ऐकून बादशहाचं पित्त खवळलं आणि तो म्हणाला,‘तू एवढा क्षुल्लक नागरिक आणि तुझी ही हिम्मत? तुझी पादत्राणे बादशहाला घालायला देतोस़? अपमान करतोस माझा?’ तो तरुण भीतीने चळचळा कापू लागला. बिरबलानं त्याला जायला सांगितलं आणि बादशहाला म्हणाला,‘तो तरुण खरं तर तुमच्या हिताचं सांगत होता, परंतु तुमची मन:स्थिती ठीक नसल्यानं तुमचा तोल गेला खाविंद!’ त्या तशा अवस्थेतही बादशहाला हसू फुटलं. त्यानं त्या तरुणाला बोलावलं, त्याची पादत्राणं घातली आणि बिरबलाला म्हणाला,‘झाला का मला धडा शिकवून? चल आता, चहाची तलफ आली आहे जोरदार!’

Tuesday, December 29, 2009

असुरक्षितता, अस्थिरता, भीती, वास्तवाकडे पाठ फिरविण्यातली अपरिहार्यता यातून प्रत्येक क्षण साजरा करण्याची वृत्ती वाढत आहे

लोकसत्ता पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी --- यशवंत गावडे

राजधानीवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि चार दिवस सर्वाना वेठीला धरलं होतं. राजधानीच्या रक्षक सैनिकांनी जीवाची बाजी लावून हल्लेखोरांना जेरबंद केलं. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा आपल्या सैनिकांच्या शौर्याची आणि जनतेच्या धीराची पावती म्हणून राज्यभर कार्यक्रम आयोजित करावेत, असा आदेश बादशहानं दिला होता. राजधानीत अनेक संघटनांनी, अनेक संस्थांनी आणि लोकांनीही उत्स्फूर्तपणे वेगवेगळे कार्यक्रम ठरविले होतेच. आपल्या जनतेची ही संवेदनशीलता पाहून बादशहा खूश झाला. प्रत्यक्ष तो दिवस उगवला तेव्हा बादशहा दिवसभर कुठं कुठं फिरून कार्यक्रम पाहत होता आणि दिवसभर, रात्रभर फिरून त्याच्या मनावर निराशेचे मळभ दाटून आले. सर्वत्र जणू उत्सव सुरू होते. वेदनेचा ठाव ठिकाणा नव्हता, जबाबदारीची जाणीव नव्हती आणि गांभीर्याचा अभाव होता. मद्याचा महापूर, रंगीबेरंगी वस्त्रे, धुंद नाचगाणी आणि शौर्याचे दिखाऊ पोवाडे सुरू होते. कार्यक्रमांचे आयोजक शहीदांवर जणू कुरघोडी करीत स्वत:च मिरवित होते. हिच का आपली ती संवेदनशील जनता, असा बादशहाला प्रश्न पडला. बादशहा पहाटे खिन्न मनाने राजवाडय़ावर परतला. सकाळी बिरबल आला तेव्हा बादशहानं आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणाला, ‘मला फार वाईट वाटले बिरबला, रात्री सर्वत्र जणू हल्ल्याच्या स्मृती साजऱ्या केल्या जात होत्या, कुठंही गांभीर्य नव्हतं, नुसता दिखाऊपणा!’
बिरबलाला बादशहाची मन:स्थिती कळली. तो म्हणाला, ‘खाविंद, तुमची निराशा साहजिकच आहे, परंतु मला तुम्हाला आणखीही काही सांगायचं आहे.’ अर्थातच बादशहानं बिरबलाला परवानगी दिली. त्यानुसार बिरबलानं तुरुंगातील एक कैदी हजर केला. तो कैदी शिक्षेच्या प्रतीक्षेत होता. बिरबलाच्या योजनेनुसार बादशहा त्या कैद्याला म्हणाला, ‘‘तुला फाशीची शिक्षा देण्याचं ठरलं आहे. तुझ्या फाशीला अजून एक आठवडा अवकाश आहे, तोवर तू मुक्त आहेस. काय हवं ते कर आणि आठवडाभरानं परत ये!’’ कैदी तिथून निघाला, अर्थातच त्याच्यावर सैनिकांची पाळत होती. आठवडाभरानं सैनिकांनी अहवाल सादर केला. त्यानुसार तो कैदी त्या काळात, खाणं-पिणं, जुगार खेळणं, स्त्रियांचा सहवास यात मनसोक्त रमला होता!
हा अहवाल ऐकल्यावर बादशहा बिरबलाला म्हणाला, ‘यातून तुला काय सिद्ध करायचं आहे बिरबल?’ बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, राजधानीवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनी तुम्ही जे पाहिलं ते सगळं याच पठडीतलं होतं. असुरक्षितता, अस्थिरता, भीती, वास्तवाकडे पाठ फिरविण्यातली अपरिहार्यता यातून प्रत्येक क्षण साजरा करण्याची वृत्ती वाढत आहे. निमित्ताचे गांभीर्य लक्षातघेण्याऐवजी निमित्त पाहून मौजमजा करण्याचं प्रमाण वाढलं आहे.. रात्री मद्यधुंद होऊन नाचणारे अनेक जण सकाळी एकांतात रडत असतात आणि ते मात्र जगाला कळत नाही!’’
बादशहा गंभीर झाला, बिरबल म्हणाला, ‘खाविंद, हे सगळं पाहून, तुमच्या,माझ्या सारख्या काही व्यक्ती अस्वस्थ होतात हेच फक्त समाधान आहे!’ बादशहाला त्याक्षणी बिरबलाचा जेवढा आधार वाटला तेवढा त्यापूर्वी कधीही नव्हता वाटला!