Showing posts with label story. Show all posts
Showing posts with label story. Show all posts

Sunday, March 21, 2010

वाईट कामांना नेहमी चांगल्या कामांनी झाकलं पाहिजे

राज्याची प्रजा राजाच्या कारभारावर नाराज होती. तिच्या मनात खूप तक्रारी होत्या. त्यामुळे एक दिवस राजाच्या विरुद्ध मोर्चा काढण्यासाठी प्रजा रस्त्यावर उतरली. ही गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली.
त्याने फर्मान सोडले की, जशी गरज असेल तसे पाऊल उचला, पण कसेही करून हा मोर्चा, हा उद्धटपणा थांबवा.
मोर्चा निघाला पण लवकरच तो गोळीबार, लाठीमार करून अडवला गेला. ज्याने बरेच लोक घायाळ झाले. इकडे तिकडे पांगले गेले. मोर्चाच्या नेत्यांना अटक केली गेली. शहरात दहशत पसरली.
काही काळानंतर प्रधानाच्या हुकूमानुसार शहरात बरीच चांगली कामे होऊ लागली, धान्य स्वस्त झालं, नवीन कारखाने उघडले गेले, रस्ते बनवले गेले. हे सगळं बघून एका सभ्य माणसाने प्रधानाला विचारलं, ‘‘तुम्ही तर कमाल करत आहात, काल तुम्ही ह्य़ा शहरातील लोकांवर गोळ्या झाडून त्यांना मारून टाकत होता आणि आज त्याच शहरातील लोकांच्या सुखासाठी, प्रगतीसाठी प्रयत्न करत आहात?
हुशार प्रधानाने उत्तर दिलं, मी मांजरीकडून एक धडा शिकलोय, तिने जर एखाद्या चांगल्या जागेवर घाण केली तर त्यावर ती लगेचच माती पसरून देते.
वाईट कामांना नेहमी चांगल्या कामांनी झाकलं पाहिजे. कारण निवडणुका येईपर्यंत लोक आम्ही केलेले वाईट काम विसरून जातील आणि आमची चांगली कामंच लक्षात ठेवतील.

Sunday, March 7, 2010

अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!

अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधी बाकावरील काही मंडळी निषेध म्हणून उठून गेली. त्यामुळं बादशहा  अस्वस्थ झाला. अर्थमंत्री एवढा विचार करून, मेहनत करून अर्थसंकल्प तयार करतात, त्यावर विचार करून त्यातील त्रुटी दाखवून द्याव्यात, काही सूचना कराव्यात हे सर्व सोडून विरोधी गटानं अर्थसंकल्प न ऐकताच पळ काढावा हे बादशहाला रुचलं नाही आणि पटलंही नाही. या सर्व प्रकारामुळं अर्थमंत्रीही नाराज झालेले दिसत होते. बादशहानं त्यांना आपल्या नजरेनंच दिलासा दिला आणि अर्थसंकल्पाचं वाचन पुढे सुरू ठेवण्यास सांगितलं.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी तो उत्तम आहे असं सांगितलं तर विरोधकांनी त्यातील दरवाढीचा निषेध केला. काही गट जे बादशहासोबत सत्तेत भागीदार होते त्यांच्या प्रदेशात निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यांनीही भाववाढीला विरोध केला.
त्याच रात्री बादशहानं बिरबलाला विचारमंथनासाठी बोलावलं. बादशहाची नाराजी बिरबलाच्या नजरेनं टिपली होती; त्यामुळं त्याला अंदाज आला होता. बिरबल आल्यावर थोडावेळ राज्याच्या दैनंदिन कामांची चर्चा झाली आणि मग बादशहानं आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. ती ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘हा त्या विरोधकांचा दोष नव्हे, आपल्या संसदीय संकल्पनांचा दोष होय.’ बादशहाला त्याचा अर्थ कळला नाही तेव्हा बिरबल अधिक स्पष्ट करत म्हणाला, ‘खाविंद आपण लोकप्रतिनिधींची विभागणी ‘सत्ताधारी आणि विरोधक’ अशी करतो. एकदा विरोधक म्हटलं की त्यानं प्रत्येक गोष्टीला विरोध करणं ओघानं आलंच. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच विरोधकांची त्यावरील प्रतिक्रिया ठरलेली असते, मग तो त्यांनी ऐकला काय आणि न ऐकला काय याने काय फरक पडतो?’ बादशहा ऐकून विचारात पडला त्याची ही मन:स्थिती हेरून बिरबल पुढे म्हणाला, ‘सत्ताधारी आणि सत्तेवर नसलेले’ अशी खरं तर विभागणी व्हायला पाहिजे. ‘यावर उपाय काय?’ बादशहानं कळीचा प्रश्न विचारला. बिरबल म्हणाला, ‘आहे ना. पुढच्या वर्षी अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!
बिरबलाची सूचना मान्य करत बादशहानं त्याला रात्रीच्या भोजनासाठी आग्रहानं थांबवून ठेवलं. ‘मी रात्री जेवायला घरी नसेन’ हे बिरबलानं घरी आधीच सांगून ठेवलं होतं.

Sunday, February 21, 2010

ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो

मंत्रिमंडळाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेणारी बैठक सुरू होती. प्रत्येक मंत्री आपापला अहवाल सादर करत होता. मंत्र्यांच्या समोर द्राक्ष्याचे तजेलदार घोस चांदीच्या तबकांमध्ये ठेवलेले होते. एकूण मंत्र्यांच्या कामगिरीवर बादशहा समाधानी होता. बिरबल शांतपणे प्रत्येक मंत्र्याचा अहवाल ऐकून टिपणं काढत होता. बैठक सुरू असतानाच अचानक बाहेर गोंगाट, घोषणाबाजी, दगडफेक अशी गडबड सुरू झाली. सुरक्षा यंत्रणा लगबगीनं कामाला लागली. बादशहाने सेवकाला बाहेर काय गडबड चालली आहे ते पाहून येण्यास सांगितले. सेवक गेला आणि परत येऊन म्हणाला, ‘खाविंद, बाहेर मोठ्ठा मोर्चा आहे, ऑस्ट्रेलियन, पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या देशात खेळायला येऊ नये, त्यांना अटकाव करावा.. अशी मागणी करीत आहेत ते!’ तोवर गृहमंत्र्यांनी जाऊन बंदोबस्ताची पाहणी करून काही आदेशही दिले होते. त्यामुळे बैठक शांततेत पार पडली.
बैठक संपल्यावर बादशहा आणि बिरबल शाही भोजनासाठी एकत्र गेले. मटारच्या करंज्या, हरभरा भात असा संपूर्ण शाकाहारी बेत होता. तोंडात तुकडा ठेवताच स्वादिष्ट सुखाची भावना भरून यावी अशा त्या करंज्यांचा आस्वाद घेता घेता बादशहा म्हणाला, ‘मला एक कळत नाही, अमूक देशांच्या खेळाडूंना इथं पाय ठेवायला देऊ नका, तमूक देशाशी खेळू नका अशी अतिरेकी भूमिका ही माणसं का घेतात? अरे हा काय पोरखेळ आहे का? राजकारण वेगळं असतं आणि खेळ, कला या गोष्टी वेगळ्या असतात!’
हरभरा भाताचा घास घेत, ताकाची वाटी हाती धरत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ही माणसं अशी अतिरेकी भूमिका घेतात हे तुमचं केवढं नशीब म्हणायचं?’ हे ऐकून बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘आता ह्यात तुला माझं नशीब कुठं दिसलं?’
जिरे-हिंगाची मस्त फोडणी घातलेल्या ताकाचा घोट घेत बिरबल म्हणाला, ‘खाविंद,  ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो. अशी माणसं सत्तेत येऊ नयेत याची काळजी लोकच घेत असतात. आणि खरं सांगायचं तर अशा मानसिकतेच्या व्यक्तींना सत्तेची जबाबदारी नकोच असते. त्यांना दहशतीचं एक समांतर साम्राज्य फक्त उभं करायचं असतं.. आणि अशी दहशत टिकविण्यासाठी ते देशभक्तीच्या भडक व्याख्या करीत अतिरेकी भूमिका घेत राहतात..!’
बादशहा खाता खाता थांबून विस्मयानं सगळं ऐकत होता. बिरबलाचं तर्कशुद्ध विश्लेषण ऐकून त्याचा चेहरा खुलून आला व तो बिरबलाला म्हणाला, ‘म्हणजे फार काळजी करण्याची गरज नाही!’ करंजीचा शेवटचा घास घेत बिरबल म्हणाला, ‘काळजी करण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजेच!’ ‘सुभानअल्लाह क्या बात कही बिरबल’ असं म्हणत बादशहानं आपल्या हातानं आणखी दोन करंज्या बिरबलाच्या ताटात घातल्या!

Monday, February 1, 2010

काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते

दिवाळीच्या सुमारास बादशाह आणि बिरबल रात्रीच्या वेळी राजधानीचा एक फेरफटका मारण्यास निघाले. सगळीकडे प्रकाशाचं साम्राज्य पसरलेलं होतं. रंगीबेरंगी दिव्यांनी आकाश व्यापलं होतं. दारादारात तेला-तूपाचे दिवे लागलेले होते. महागडय़ा वस्त्रांची दुकानं गर्दीनं तुडुंब भरलेली होती. जिथं-तिथं ‘डिस्काऊंट सेल’ लागलेले होते आणि तिथं अधिकच गर्दी होती. सुगंधी फवारे, सुगंधी तेले, उटणे यामुळं आसमंत सुगंधाच्या विविधतेत न्हाला होता. फराळाच्या पदार्थाची दुकानं पिशव्या भरभरून पदार्थ विकत होती. शिवाय घराघरात तळणी-भाजणी सुरू होतीच. मूलं-माणसं फटाक्यांचा, शोभेच्या दारूचा आनंद लुटत होती. हे सर्व पाहता पाहता बादशाह अचानक थबकला आणि बिरबलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘एकूण मला तुम्ही जे काही रिपोर्ट्स देता ते सगळे खोटे आणि फसवे असतात तर!’’ बिरबल म्हणाला, ‘‘ तुम्हाला काय म्हणायचे आहे खाविंद?’’ बादशहा घुश्शातच म्हणाला, ‘‘महागाई, मंदी, नोकरकपात, दुष्काळ, नापिकी, भ्रष्टाचार यामुळं जनता त्रस्त आहे असं तू मला नेहमी सांगत असतोस.. आणि प्रत्यक्षात तर जनता आनंदी दिसते आहे. केवढा उत्साह आहे दिवाळीचा? कुठं आहे तुझी ती महागाई? कुठं आहे मंदी?’’ बिरबल काहीच बोलला नाही, कारण बादशहाचा पारा खूपच चढलेला होता. बादशहाला जरा वेळानं बिरबलानं निरोपाचा कुर्निसात केला तेव्हाही तो रागातच होता. आठवडाभरानं बिरबल पुन्हा बादशहाच्यासमोर बसलेला होता. बादशहाच्या सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता त्याविषयी विचार करण्यासाठी ही बैठक होती. बैठक सुरू झाली आणि मोठय़ा बेगमची दासी धावत आली. म्हणाली, ‘‘बेगमच्या अब्बाजानची तब्येत खूपच खालावली आहे.’’ ते ऐकून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, अशा स्थितीत आपण सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन करू नये!’’ त्यावर बादशहा म्हणाला, ‘‘बिरबल, काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते.’’ हे ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘‘लोक दिवाळी साजरी करताना, असाच विचार करतात खाविंद!’’ बादशहा चमकचा आणि दासीकडे पाहून म्हणाला, ‘‘अगं मोठय़ा बेगमच्या अब्बाजानच्या इंतकाल (निधन) तर गेल्यावर्षीच झाला ना?’’ आणि मग बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘आम्हाला धडा शिकवलात ना, चला आता वर्धापनदिनाची तयारी करू या!

Wednesday, January 20, 2010

लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!

नागरिकांनी मतदानासाठी मोठय़ा प्रमाणात बाहेर पडावे, मतदानाच्या दिवशी पिकनिकला वगैरे जाऊ नये, भयमुक्त मतदान करावे म्हणून स्वत: बादशहा आवाहन करत होता. बिरबलानेही ठिकठिकाणी सभा घेऊन नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. परंतु एका बुद्धिवाद्याने या उलट प्रचार सुरू केला. ‘सगळे उमेदवार भ्रष्ट आहेत, खोटारडे आहेत, मतलबी आहेत, तेव्हा मतदान करू नका.’ सामान्य माणूस अनेकदा आवश्यक असेल तेव्हा चिरीमिरी देऊन स्वत:ची कामे करून घेतो, परंतु नेत्यांच्या भ्रष्ट आचाराविषयी जागरूक असतो. त्यामुळं, मतदानाला विरोध करणाऱ्या बुद्धिवाद्याच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला. ते पाहून बादशहा काळजीत पडला. बिरबलही विचारात पडला. मग बिरबलानं त्याची चौकशी यंत्रणा कामाला लावली. चौकशी पूर्ण झाल्यावर बिरबलानं बुद्धिवादी नेत्याला भोजनाचं निमंत्रण दिलं. गप्पा-टप्पा, चर्चा असं बरंच काही झाल्यावर रात्री उशीरा सगळ्यांना सपाटून भूक लागली. मग जेवण वाढलं जाऊ लागलं. बुद्धिवाद्याकडे पाहून बिरबल म्हणाला, ‘माफी असावी. आपण नॉनव्हेज खात नाही आणि व्हेजमध्ये सुध्दा तुमची नावडती वांग्याची, भेंडीची भाजी आहे. तेव्हा आपण आज जेवला नाहीत तरी चालेल!’ बुद्धिवादी म्हणाला, ‘अहो, आता एव्हढय़ा रात्री निवड करायला कुठं वेळ आहे, पोट भरलं नाही तर शरीराची यंत्रणा कशी चालेल?’ बिरबल हसत हसत म्हणाला, ‘माझंही तेच म्हणणं आहे. लोकशाहीची यंत्रणा चालायला हवी ना? आपल्यापुढं जे पर्याय आहेत त्यातून एक निवडायचा आणि अधिक चांगल्या पर्यायाची वाट पाहायची!’ बुद्धिवादी खजिल झाला आणि त्यानं मसाल्याची वांगी ताटात वाढून घेतली. अर्थातच मतदानविरोधी चळवळ त्यानं बंद केली. बिरबलाची ‘डिनर डिप्लोमसी’ बादशहाला बेफाम आवडली आणि त्यानं बिरबलाला ‘रेशमी कबाब’चा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केलं!

Tuesday, January 19, 2010

इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?

बादशहानं आपल्या मुलाचं इतिहासाचं पाठय़पुस्तक सहज म्हणून चाळलं आणि ते वाचता वाचता तो भयंकर संतापला. पाठय़पुस्तकात बादशहाच्या कर्तृत्ववान खापर पणजोबांवर एक धडा होता. त्या धडय़ात बादशहाच्या खापर पणजोबांविषयी दिलेली काही माहिती बादशहाला रुचली नाही. बादशहानं संतापून ते पुस्तक भिरकावून दिलं आणि बिरबलाला बोलावणं धाडलं. बादशहाला एवढं संतापलेलं बिरबलानं कधीच पाहिलेलं नव्हतं. ‘खाविंद, एवढं संतापायला काय झालंय आज?’ असं त्यानं विचारताच बादशहानं इतिहासाच्या पुस्तकातील धडय़ाविषयी त्याला सांगितलं. बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांची आणि सत्ताधिशांची मर्जी सांभाळणारे, लाळघोटे इतिहासकार आपल्या राज्यात नाहीत, याचा तुम्हाला खरं तर अभिमान वाटायला हवा!’ बादशहा म्हणाला, ‘परंतु हे सगळं खोटं आहे! बिरबल म्हणाला, ‘ठीक आहे, मग काय करावं, अशी तुमची इच्छा आहे?’ बादशहा म्हणाला, ‘हे सर्व बदलून टाका, माझ्या खापरपणजोबांविषयी काय लिहायचं ते मीच सांगेन! बादशहाच्या आदेशानुसार नवा इतिहास लिहिण्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यानंतर चार दिवसांनी बादशहा आणि बिरबल सकाळी फिरायला गेले असताना बादशहाला ठेच लागली आणि त्याचं पायाचं बोट रक्ताळलं. राजवाडय़ावर परत आल्यावर बादशहाचा धाकटा मुलगा त्याच्या पायाकडे पाहत म्हणाला, ‘अब्बाजान, काय झालं?’ बादशहाला बोलण्याची संधी न देता बिरबल म्हणाला, ‘‘रस्त्यात एक साप आडवा आला, खाविंदांनी त्याला लाथेनं उडवलं. त्यामुळे बोटाला जखम झाली. मुलानं बापाकडे अभिमानानं पाहिलं आणि तो बापाचा पराक्रम आईला सांगण्यासाठी घरात पळाला. बादशहा विस्मयानं बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘अरे त्याला खोटं का सांगितलंस! खरं सांगितलं असतं तर त्या रस्त्यानं दगड आहेत, सांभाळून चाललं पाहिजे हे तरी त्याला कळलं असतं!’
बिरबल म्हणाला, ‘खाविंद, पुढं भविष्यात तुमचा एखादा खापर पणतू खोटा इतिहास लिहिल, त्यापेक्षा आपण आताच त्याची व्यवस्था केलेली बरी!’
अर्थात बादशहा हे ऐकून वरमला. त्याची ती स्थिती पाहून बिरबल म्हणाला, ‘खाविंद, राज्यकर्त्यांमध्ये आणि समाजाच्या नेतृत्वामध्येच जर इतिहास पचवण्याची ताकद नसेल तर समाजात ती कुठून येणार? आणि इतिहासातील चुकांमधून वर्तमानाने धडा घ्यायचा तर इतिहास जसाच्या तसा लिहिला जाणं आवश्यक नाही का?’ बादशहा हे ऐकून खिन्न झाला, कारण त्याची विवेकबुद्धी शाबूत होती.

Tuesday, January 12, 2010

समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे

बादशहाच्या दरबारातील एका कलावंतानं राज्याबाहेर जाऊन आपल्या नाटय़कृतीचे प्रयोग केले आणि त्या नाटय़कृतीचं सगळीकडे प्रचंड कौतुक झालं. त्या नाटकाला अनेक राज्यांमध्ये सन्मानित केलं गेलं. तो कलावंत आपला संच घेऊन राज्यात परतला तेव्हा राज्यातही त्याचं मोठं स्वागत करण्यात आलं. बादशहानं त्या नाटय़कृतीच्या लेखकाचा, दिग्दर्शकाचा आणि कलावंतांचा दरबारी सन्मान करायचं ठरवलं. ह्य़ा सत्कार सोहळ्याला मंत्री, त्यांचे कुटुंबीय आणि सामान्य नागरिकांनीही खच्चून गर्दी केली. बादशहा आपल्या दोन्ही बेगमसह उपस्थित होता. आधी त्या नाटकाचा रंगतदार प्रयोग झाला. टाळ्यांच्या कडकडाटात दिग्दर्शक मंचावर उपस्थित झाला. खुद्द बादशहानं त्याच्या सर्जनशीलतेला लवून कुर्निसात केला. शाही सन्मान प्रदान करण्याची घटीका आली आणि एक दरबारी पंडीत रागाने थरथरत उभा राहिला व म्हणाला, ‘खाविंद, आपल्या राज्यातील गरीबी आणि गरिबांची वस्ती या नाटकात दाखविली आहे. या नाटकाचा सन्मान करून इतर राज्यांनी आपल्याला खिजवलं आहे, हिणवलं आहे. तेव्हा आपणही याचा सन्मान करणं हा मूर्खपणा आहे असं मला वाटतं.’ त्या पंडिताच्या हुषारीचा दराराच असा होता की, उपस्थित अंतर्मूख झाले. अनेकांच्या चेहऱ्यावर चलबिचल दिसू लागली. बादशहाच्या नजरेचा इशारा ओळखून बिरबल उठून उभा राहिला व त्या पंडिताला म्हणाला, ‘आपण आम्हाला आदरणीय आहात. मी एक प्रश्न विचारू का?’ पंडितानं होकार दिल्यावर बिरबल म्हणाला, ‘ही गरीब वस्ती म्हणजे काय आहे असं वाटतं आपल्याला?’ पंडीत विजयी मुद्रेनं म्हणाला, ‘राज्याच्या सुदृढ शरीराला आलेली किळसवाणी गाठ आहे ती!’ बिरबल हसत उत्तरला, ‘मग गाठ लपवून ठेवणं राज्याच्या हिताचं आहे की ती जगाला दाखवून तिच्यावर इलाज करणं हिताचं आहे?’ प्रश्न ऐकून पंडिताचा चेहरा उतरला. ती संधी घेत बिरबल म्हणाला, मला वाटतं, समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे. ते या नाटय़कृतीनं केलं आहे. आता त्यावर उपाय शोधण्याचं पुढलं काम आपण करायचं आहे.’ टाळ्यांचा कडकडाट झाला आणि बादशहानं बिरबलाकडे कृतज्ञतेचा कटाक्ष टाकत कार्यक्रम पुढं सुरू केला.

Sunday, January 3, 2010

तो तरुण खरं तर तुमच्या हिताचं सांगत होता, परंतु तुमची मन:स्थिती ठीक नसल्यानं तुमचा तोल गेला खाविंद!

लोकसत्ता पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी --- यशवंत गावडे

बादशाह आणि बिरबल शेजारच्या राज्यातली वृत्तपत्रं उत्सुकतेनं चाळत बसले होते. त्या देशातल्या एका सभ्य व्यक्तीनं ‘विरोधी पक्ष अस्थीर असणं बरं नव्हे’ असं म्हटलं तर त्याला ‘तुम्ही तुमचं बघा, आमचं आम्ही बघून घेऊ असं’ उत्तर विरोधकांनी दिलं. ते वाचनू बादशहा म्हणाला,‘अरे ही माणसं चांगल्या मनानं सांगितलंले सुद्धा ऐकून का घेत नाहीत? ’ आपल्या हिताची गोष्टही ऐकून घ्यावीशी वाटत नाही’ बादशहाला काही ते पटलं नाही. दोघांमध्ये बराच वेळ ह्यावर वाद सुरू होता. दुसऱ्या दिवशी सकाळी बादशहा आणि बिरबल घोडय़ांवरून रपेट मारायला जाणार होते. परंतु बादशहाचा आवडता घोडा आजारी आहे असं पार्टीच्या प्रमुखानं सांगितलं. बादशहाचा मूड गेला. तो बिरबलाला म्हणाला, ‘आज माझा अंगरखाही नीट बसलेला नाही आणि घोडा आजारी आहे. आपण पयीच फिरायला जाऊया.’ दोघे फिरायला निघाले. बिरबल बादशहाला म्हणाला,‘पायीच जायचं आहे तर मग नेहमीपेक्षा वेगळ्या रस्त्यानं जाऊया!’ दोघेही निघाले. थोडं चालून गेल्यावर बादश्हा म्हणाला,‘हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी ह्यावर्षी आपण निधी मंजूर केला होता ना?’ बिरबल म्हणाला,‘होय खाविंद, रस्ता बहुतेक नीट दुरूस्त केला नसणार. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा उखडला.’ थोडं पुढे एका इमारतीचं काम अध्र्यावरच बंद पडून शेवाळ धरलं होतं. ‘हे असं बंद का पडलंय?’ बादशहानं विचारलं. ‘माफी असावी खाविंद. आपले अधिकारी पैसे खाऊन बांधकामांना परवानगी देतात आणि मग त्याच व्यवहारात कमी जास्त झालं की काम बंद पाडतात.’ बिरबल म्हणाला. हे ऐकून बादशहाचा मूड अधिकच खराब झाला. भरीस भर म्हणून चालता चालता बादशहाच्या चपलेचा अंगठा तुटला. कसा तरी लंगडत, अडखळत बादशहा परतीच्या वाटेला निघाला. त्याला असं चालताना पाहून एक तरूण थांबला. त्यानं आपली पादत्राणं काढली आणि बादशहाला म्हणाला,‘हुजूर, आपण माझी पादत्राणं घालून जा. आपली चप्पल दुरूस्त करून मी राजवाडय़ावर आणून देतो.’ त्याचं ते बोलणं ऐकून बादशहाचं पित्त खवळलं आणि तो म्हणाला,‘तू एवढा क्षुल्लक नागरिक आणि तुझी ही हिम्मत? तुझी पादत्राणे बादशहाला घालायला देतोस़? अपमान करतोस माझा?’ तो तरुण भीतीने चळचळा कापू लागला. बिरबलानं त्याला जायला सांगितलं आणि बादशहाला म्हणाला,‘तो तरुण खरं तर तुमच्या हिताचं सांगत होता, परंतु तुमची मन:स्थिती ठीक नसल्यानं तुमचा तोल गेला खाविंद!’ त्या तशा अवस्थेतही बादशहाला हसू फुटलं. त्यानं त्या तरुणाला बोलावलं, त्याची पादत्राणं घातली आणि बिरबलाला म्हणाला,‘झाला का मला धडा शिकवून? चल आता, चहाची तलफ आली आहे जोरदार!’

Tuesday, December 29, 2009

असुरक्षितता, अस्थिरता, भीती, वास्तवाकडे पाठ फिरविण्यातली अपरिहार्यता यातून प्रत्येक क्षण साजरा करण्याची वृत्ती वाढत आहे

लोकसत्ता पेपर मधून काही निवडक लेखाची कात्रणे तुमच्यासाठी --- यशवंत गावडे

राजधानीवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि चार दिवस सर्वाना वेठीला धरलं होतं. राजधानीच्या रक्षक सैनिकांनी जीवाची बाजी लावून हल्लेखोरांना जेरबंद केलं. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा आपल्या सैनिकांच्या शौर्याची आणि जनतेच्या धीराची पावती म्हणून राज्यभर कार्यक्रम आयोजित करावेत, असा आदेश बादशहानं दिला होता. राजधानीत अनेक संघटनांनी, अनेक संस्थांनी आणि लोकांनीही उत्स्फूर्तपणे वेगवेगळे कार्यक्रम ठरविले होतेच. आपल्या जनतेची ही संवेदनशीलता पाहून बादशहा खूश झाला. प्रत्यक्ष तो दिवस उगवला तेव्हा बादशहा दिवसभर कुठं कुठं फिरून कार्यक्रम पाहत होता आणि दिवसभर, रात्रभर फिरून त्याच्या मनावर निराशेचे मळभ दाटून आले. सर्वत्र जणू उत्सव सुरू होते. वेदनेचा ठाव ठिकाणा नव्हता, जबाबदारीची जाणीव नव्हती आणि गांभीर्याचा अभाव होता. मद्याचा महापूर, रंगीबेरंगी वस्त्रे, धुंद नाचगाणी आणि शौर्याचे दिखाऊ पोवाडे सुरू होते. कार्यक्रमांचे आयोजक शहीदांवर जणू कुरघोडी करीत स्वत:च मिरवित होते. हिच का आपली ती संवेदनशील जनता, असा बादशहाला प्रश्न पडला. बादशहा पहाटे खिन्न मनाने राजवाडय़ावर परतला. सकाळी बिरबल आला तेव्हा बादशहानं आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हणाला, ‘मला फार वाईट वाटले बिरबला, रात्री सर्वत्र जणू हल्ल्याच्या स्मृती साजऱ्या केल्या जात होत्या, कुठंही गांभीर्य नव्हतं, नुसता दिखाऊपणा!’
बिरबलाला बादशहाची मन:स्थिती कळली. तो म्हणाला, ‘खाविंद, तुमची निराशा साहजिकच आहे, परंतु मला तुम्हाला आणखीही काही सांगायचं आहे.’ अर्थातच बादशहानं बिरबलाला परवानगी दिली. त्यानुसार बिरबलानं तुरुंगातील एक कैदी हजर केला. तो कैदी शिक्षेच्या प्रतीक्षेत होता. बिरबलाच्या योजनेनुसार बादशहा त्या कैद्याला म्हणाला, ‘‘तुला फाशीची शिक्षा देण्याचं ठरलं आहे. तुझ्या फाशीला अजून एक आठवडा अवकाश आहे, तोवर तू मुक्त आहेस. काय हवं ते कर आणि आठवडाभरानं परत ये!’’ कैदी तिथून निघाला, अर्थातच त्याच्यावर सैनिकांची पाळत होती. आठवडाभरानं सैनिकांनी अहवाल सादर केला. त्यानुसार तो कैदी त्या काळात, खाणं-पिणं, जुगार खेळणं, स्त्रियांचा सहवास यात मनसोक्त रमला होता!
हा अहवाल ऐकल्यावर बादशहा बिरबलाला म्हणाला, ‘यातून तुला काय सिद्ध करायचं आहे बिरबल?’ बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, राजधानीवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनी तुम्ही जे पाहिलं ते सगळं याच पठडीतलं होतं. असुरक्षितता, अस्थिरता, भीती, वास्तवाकडे पाठ फिरविण्यातली अपरिहार्यता यातून प्रत्येक क्षण साजरा करण्याची वृत्ती वाढत आहे. निमित्ताचे गांभीर्य लक्षातघेण्याऐवजी निमित्त पाहून मौजमजा करण्याचं प्रमाण वाढलं आहे.. रात्री मद्यधुंद होऊन नाचणारे अनेक जण सकाळी एकांतात रडत असतात आणि ते मात्र जगाला कळत नाही!’’
बादशहा गंभीर झाला, बिरबल म्हणाला, ‘खाविंद, हे सगळं पाहून, तुमच्या,माझ्या सारख्या काही व्यक्ती अस्वस्थ होतात हेच फक्त समाधान आहे!’ बादशहाला त्याक्षणी बिरबलाचा जेवढा आधार वाटला तेवढा त्यापूर्वी कधीही नव्हता वाटला!