Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Thursday, May 6, 2010

जीवाची कसरत अन शाळेसाठी धडपड

Sunday, March 21, 2010

वाईट कामांना नेहमी चांगल्या कामांनी झाकलं पाहिजे

राज्याची प्रजा राजाच्या कारभारावर नाराज होती. तिच्या मनात खूप तक्रारी होत्या. त्यामुळे एक दिवस राजाच्या विरुद्ध मोर्चा काढण्यासाठी प्रजा रस्त्यावर उतरली. ही गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली.
त्याने फर्मान सोडले की, जशी गरज असेल तसे पाऊल उचला, पण कसेही करून हा मोर्चा, हा उद्धटपणा थांबवा.
मोर्चा निघाला पण लवकरच तो गोळीबार, लाठीमार करून अडवला गेला. ज्याने बरेच लोक घायाळ झाले. इकडे तिकडे पांगले गेले. मोर्चाच्या नेत्यांना अटक केली गेली. शहरात दहशत पसरली.
काही काळानंतर प्रधानाच्या हुकूमानुसार शहरात बरीच चांगली कामे होऊ लागली, धान्य स्वस्त झालं, नवीन कारखाने उघडले गेले, रस्ते बनवले गेले. हे सगळं बघून एका सभ्य माणसाने प्रधानाला विचारलं, ‘‘तुम्ही तर कमाल करत आहात, काल तुम्ही ह्य़ा शहरातील लोकांवर गोळ्या झाडून त्यांना मारून टाकत होता आणि आज त्याच शहरातील लोकांच्या सुखासाठी, प्रगतीसाठी प्रयत्न करत आहात?
हुशार प्रधानाने उत्तर दिलं, मी मांजरीकडून एक धडा शिकलोय, तिने जर एखाद्या चांगल्या जागेवर घाण केली तर त्यावर ती लगेचच माती पसरून देते.
वाईट कामांना नेहमी चांगल्या कामांनी झाकलं पाहिजे. कारण निवडणुका येईपर्यंत लोक आम्ही केलेले वाईट काम विसरून जातील आणि आमची चांगली कामंच लक्षात ठेवतील.

Sunday, March 7, 2010

अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!

अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधी बाकावरील काही मंडळी निषेध म्हणून उठून गेली. त्यामुळं बादशहा  अस्वस्थ झाला. अर्थमंत्री एवढा विचार करून, मेहनत करून अर्थसंकल्प तयार करतात, त्यावर विचार करून त्यातील त्रुटी दाखवून द्याव्यात, काही सूचना कराव्यात हे सर्व सोडून विरोधी गटानं अर्थसंकल्प न ऐकताच पळ काढावा हे बादशहाला रुचलं नाही आणि पटलंही नाही. या सर्व प्रकारामुळं अर्थमंत्रीही नाराज झालेले दिसत होते. बादशहानं त्यांना आपल्या नजरेनंच दिलासा दिला आणि अर्थसंकल्पाचं वाचन पुढे सुरू ठेवण्यास सांगितलं.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा सत्ताधाऱ्यांनी तो उत्तम आहे असं सांगितलं तर विरोधकांनी त्यातील दरवाढीचा निषेध केला. काही गट जे बादशहासोबत सत्तेत भागीदार होते त्यांच्या प्रदेशात निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यांनीही भाववाढीला विरोध केला.
त्याच रात्री बादशहानं बिरबलाला विचारमंथनासाठी बोलावलं. बादशहाची नाराजी बिरबलाच्या नजरेनं टिपली होती; त्यामुळं त्याला अंदाज आला होता. बिरबल आल्यावर थोडावेळ राज्याच्या दैनंदिन कामांची चर्चा झाली आणि मग बादशहानं आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. ती ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘हा त्या विरोधकांचा दोष नव्हे, आपल्या संसदीय संकल्पनांचा दोष होय.’ बादशहाला त्याचा अर्थ कळला नाही तेव्हा बिरबल अधिक स्पष्ट करत म्हणाला, ‘खाविंद आपण लोकप्रतिनिधींची विभागणी ‘सत्ताधारी आणि विरोधक’ अशी करतो. एकदा विरोधक म्हटलं की त्यानं प्रत्येक गोष्टीला विरोध करणं ओघानं आलंच. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच विरोधकांची त्यावरील प्रतिक्रिया ठरलेली असते, मग तो त्यांनी ऐकला काय आणि न ऐकला काय याने काय फरक पडतो?’ बादशहा ऐकून विचारात पडला त्याची ही मन:स्थिती हेरून बिरबल पुढे म्हणाला, ‘सत्ताधारी आणि सत्तेवर नसलेले’ अशी खरं तर विभागणी व्हायला पाहिजे. ‘यावर उपाय काय?’ बादशहानं कळीचा प्रश्न विचारला. बिरबल म्हणाला, ‘आहे ना. पुढच्या वर्षी अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विरोधकांकडून लेखी सूचना मागवा, म्हणजे त्यांना निव्वळ विरोधकाच्या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल!
बिरबलाची सूचना मान्य करत बादशहानं त्याला रात्रीच्या भोजनासाठी आग्रहानं थांबवून ठेवलं. ‘मी रात्री जेवायला घरी नसेन’ हे बिरबलानं घरी आधीच सांगून ठेवलं होतं.

Sunday, February 21, 2010

ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो

मंत्रिमंडळाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेणारी बैठक सुरू होती. प्रत्येक मंत्री आपापला अहवाल सादर करत होता. मंत्र्यांच्या समोर द्राक्ष्याचे तजेलदार घोस चांदीच्या तबकांमध्ये ठेवलेले होते. एकूण मंत्र्यांच्या कामगिरीवर बादशहा समाधानी होता. बिरबल शांतपणे प्रत्येक मंत्र्याचा अहवाल ऐकून टिपणं काढत होता. बैठक सुरू असतानाच अचानक बाहेर गोंगाट, घोषणाबाजी, दगडफेक अशी गडबड सुरू झाली. सुरक्षा यंत्रणा लगबगीनं कामाला लागली. बादशहाने सेवकाला बाहेर काय गडबड चालली आहे ते पाहून येण्यास सांगितले. सेवक गेला आणि परत येऊन म्हणाला, ‘खाविंद, बाहेर मोठ्ठा मोर्चा आहे, ऑस्ट्रेलियन, पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या देशात खेळायला येऊ नये, त्यांना अटकाव करावा.. अशी मागणी करीत आहेत ते!’ तोवर गृहमंत्र्यांनी जाऊन बंदोबस्ताची पाहणी करून काही आदेशही दिले होते. त्यामुळे बैठक शांततेत पार पडली.
बैठक संपल्यावर बादशहा आणि बिरबल शाही भोजनासाठी एकत्र गेले. मटारच्या करंज्या, हरभरा भात असा संपूर्ण शाकाहारी बेत होता. तोंडात तुकडा ठेवताच स्वादिष्ट सुखाची भावना भरून यावी अशा त्या करंज्यांचा आस्वाद घेता घेता बादशहा म्हणाला, ‘मला एक कळत नाही, अमूक देशांच्या खेळाडूंना इथं पाय ठेवायला देऊ नका, तमूक देशाशी खेळू नका अशी अतिरेकी भूमिका ही माणसं का घेतात? अरे हा काय पोरखेळ आहे का? राजकारण वेगळं असतं आणि खेळ, कला या गोष्टी वेगळ्या असतात!’
हरभरा भाताचा घास घेत, ताकाची वाटी हाती धरत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, ही माणसं अशी अतिरेकी भूमिका घेतात हे तुमचं केवढं नशीब म्हणायचं?’ हे ऐकून बादशहा आश्चर्यानं म्हणाला, ‘आता ह्यात तुला माझं नशीब कुठं दिसलं?’
जिरे-हिंगाची मस्त फोडणी घातलेल्या ताकाचा घोट घेत बिरबल म्हणाला, ‘खाविंद,  ज्या व्यक्ती अतिरेकी आणि असहिष्णू भूमिका घेतात त्यांना राज्यकारभार करायचा नसतो. अशी माणसं सत्तेत येऊ नयेत याची काळजी लोकच घेत असतात. आणि खरं सांगायचं तर अशा मानसिकतेच्या व्यक्तींना सत्तेची जबाबदारी नकोच असते. त्यांना दहशतीचं एक समांतर साम्राज्य फक्त उभं करायचं असतं.. आणि अशी दहशत टिकविण्यासाठी ते देशभक्तीच्या भडक व्याख्या करीत अतिरेकी भूमिका घेत राहतात..!’
बादशहा खाता खाता थांबून विस्मयानं सगळं ऐकत होता. बिरबलाचं तर्कशुद्ध विश्लेषण ऐकून त्याचा चेहरा खुलून आला व तो बिरबलाला म्हणाला, ‘म्हणजे फार काळजी करण्याची गरज नाही!’ करंजीचा शेवटचा घास घेत बिरबल म्हणाला, ‘काळजी करण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजेच!’ ‘सुभानअल्लाह क्या बात कही बिरबल’ असं म्हणत बादशहानं आपल्या हातानं आणखी दोन करंज्या बिरबलाच्या ताटात घातल्या!

Monday, February 1, 2010

काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते

दिवाळीच्या सुमारास बादशाह आणि बिरबल रात्रीच्या वेळी राजधानीचा एक फेरफटका मारण्यास निघाले. सगळीकडे प्रकाशाचं साम्राज्य पसरलेलं होतं. रंगीबेरंगी दिव्यांनी आकाश व्यापलं होतं. दारादारात तेला-तूपाचे दिवे लागलेले होते. महागडय़ा वस्त्रांची दुकानं गर्दीनं तुडुंब भरलेली होती. जिथं-तिथं ‘डिस्काऊंट सेल’ लागलेले होते आणि तिथं अधिकच गर्दी होती. सुगंधी फवारे, सुगंधी तेले, उटणे यामुळं आसमंत सुगंधाच्या विविधतेत न्हाला होता. फराळाच्या पदार्थाची दुकानं पिशव्या भरभरून पदार्थ विकत होती. शिवाय घराघरात तळणी-भाजणी सुरू होतीच. मूलं-माणसं फटाक्यांचा, शोभेच्या दारूचा आनंद लुटत होती. हे सर्व पाहता पाहता बादशाह अचानक थबकला आणि बिरबलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘एकूण मला तुम्ही जे काही रिपोर्ट्स देता ते सगळे खोटे आणि फसवे असतात तर!’’ बिरबल म्हणाला, ‘‘ तुम्हाला काय म्हणायचे आहे खाविंद?’’ बादशहा घुश्शातच म्हणाला, ‘‘महागाई, मंदी, नोकरकपात, दुष्काळ, नापिकी, भ्रष्टाचार यामुळं जनता त्रस्त आहे असं तू मला नेहमी सांगत असतोस.. आणि प्रत्यक्षात तर जनता आनंदी दिसते आहे. केवढा उत्साह आहे दिवाळीचा? कुठं आहे तुझी ती महागाई? कुठं आहे मंदी?’’ बिरबल काहीच बोलला नाही, कारण बादशहाचा पारा खूपच चढलेला होता. बादशहाला जरा वेळानं बिरबलानं निरोपाचा कुर्निसात केला तेव्हाही तो रागातच होता. आठवडाभरानं बिरबल पुन्हा बादशहाच्यासमोर बसलेला होता. बादशहाच्या सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा करायचा होता त्याविषयी विचार करण्यासाठी ही बैठक होती. बैठक सुरू झाली आणि मोठय़ा बेगमची दासी धावत आली. म्हणाली, ‘‘बेगमच्या अब्बाजानची तब्येत खूपच खालावली आहे.’’ ते ऐकून बिरबल म्हणाला, ‘‘खाविंद, अशा स्थितीत आपण सत्ता स्थापनेचा वर्धापनदिन करू नये!’’ त्यावर बादशहा म्हणाला, ‘‘बिरबल, काही प्रसंग असे असतात, ते साजरे करावेच लागतात, त्यातून जगण्याची उभारी मिळते, संघर्षांला बळ प्राप्त होते.’’ हे ऐकून बिरबल हसला आणि म्हणाला, ‘‘लोक दिवाळी साजरी करताना, असाच विचार करतात खाविंद!’’ बादशहा चमकचा आणि दासीकडे पाहून म्हणाला, ‘‘अगं मोठय़ा बेगमच्या अब्बाजानच्या इंतकाल (निधन) तर गेल्यावर्षीच झाला ना?’’ आणि मग बिरबलाकडे पाहत म्हणाला, ‘‘आम्हाला धडा शिकवलात ना, चला आता वर्धापनदिनाची तयारी करू या!