Tuesday, January 12, 2010

समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे

बादशहाच्या दरबारातील एका कलावंतानं राज्याबाहेर जाऊन आपल्या नाटय़कृतीचे प्रयोग केले आणि त्या नाटय़कृतीचं सगळीकडे प्रचंड कौतुक झालं. त्या नाटकाला अनेक राज्यांमध्ये सन्मानित केलं गेलं. तो कलावंत आपला संच घेऊन राज्यात परतला तेव्हा राज्यातही त्याचं मोठं स्वागत करण्यात आलं. बादशहानं त्या नाटय़कृतीच्या लेखकाचा, दिग्दर्शकाचा आणि कलावंतांचा दरबारी सन्मान करायचं ठरवलं. ह्य़ा सत्कार सोहळ्याला मंत्री, त्यांचे कुटुंबीय आणि सामान्य नागरिकांनीही खच्चून गर्दी केली. बादशहा आपल्या दोन्ही बेगमसह उपस्थित होता. आधी त्या नाटकाचा रंगतदार प्रयोग झाला. टाळ्यांच्या कडकडाटात दिग्दर्शक मंचावर उपस्थित झाला. खुद्द बादशहानं त्याच्या सर्जनशीलतेला लवून कुर्निसात केला. शाही सन्मान प्रदान करण्याची घटीका आली आणि एक दरबारी पंडीत रागाने थरथरत उभा राहिला व म्हणाला, ‘खाविंद, आपल्या राज्यातील गरीबी आणि गरिबांची वस्ती या नाटकात दाखविली आहे. या नाटकाचा सन्मान करून इतर राज्यांनी आपल्याला खिजवलं आहे, हिणवलं आहे. तेव्हा आपणही याचा सन्मान करणं हा मूर्खपणा आहे असं मला वाटतं.’ त्या पंडिताच्या हुषारीचा दराराच असा होता की, उपस्थित अंतर्मूख झाले. अनेकांच्या चेहऱ्यावर चलबिचल दिसू लागली. बादशहाच्या नजरेचा इशारा ओळखून बिरबल उठून उभा राहिला व त्या पंडिताला म्हणाला, ‘आपण आम्हाला आदरणीय आहात. मी एक प्रश्न विचारू का?’ पंडितानं होकार दिल्यावर बिरबल म्हणाला, ‘ही गरीब वस्ती म्हणजे काय आहे असं वाटतं आपल्याला?’ पंडीत विजयी मुद्रेनं म्हणाला, ‘राज्याच्या सुदृढ शरीराला आलेली किळसवाणी गाठ आहे ती!’ बिरबल हसत उत्तरला, ‘मग गाठ लपवून ठेवणं राज्याच्या हिताचं आहे की ती जगाला दाखवून तिच्यावर इलाज करणं हिताचं आहे?’ प्रश्न ऐकून पंडिताचा चेहरा उतरला. ती संधी घेत बिरबल म्हणाला, मला वाटतं, समाजाला लांच्छनास्पद असलेल्या गोष्टी जगाला सांगणं, उजेडात आणणं हे कोणत्याही कलेचं एक महत्त्वाचं काम आहे. ते या नाटय़कृतीनं केलं आहे. आता त्यावर उपाय शोधण्याचं पुढलं काम आपण करायचं आहे.’ टाळ्यांचा कडकडाट झाला आणि बादशहानं बिरबलाकडे कृतज्ञतेचा कटाक्ष टाकत कार्यक्रम पुढं सुरू केला.

No comments:

Post a Comment